जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संवाद मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह माजीमंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, आमदार मधुसूदन केंद्रे, आमदार रामराव वडकुते, माजी खासदार गणेश दुधगावकर, स्वराजसिंह परिहार, राजेश विटेकर उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘सत्तेत बसलेल्या शिवसेनेने प्रत्येक वेळी सत्ताविरोधी भूमिका घेतली. दुटप्पी राजकारण केले. मात्र, शिवसेनेने त्यांच्या भूमिकेवर ठाम रहावे. सत्तेतील पक्षांना राज्यातील विकासकामे करण्यासाठी चांगली संधी आहे. चांगले बहुमत असतानाही त्यांना फायदा उचलता येत नाही. यामुळे संपूर्ण राज्यात अस्वस्थ वातावरण आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत माहिती बाहेर कोणीही देऊ नये. शिवाय, सध्या पक्षपातळीवर महिला संघटन, युवकांची फळी देखील मजबूत होत असून आगामी काळात पक्षातील सर्व पदे भरले जातील. त्यानंतर पक्ष ताकदीने पुढे येणार आहे.’
यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी राज्य सरकारने कर्जमुक्तीबाबत शेतकरी वर्गाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. सरसकट कर्जमाफीचे गाजर दाखवले जात आहे. मात्र, कर्जमाफीसाठी अनेक जाचक निकष लावले आहेत. हे निकष हवेत कशाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट