म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बोंडअळी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, गुजराजप्रमाणे कापसाला बोनस द्या, सरकार हमसे डरती है, पोलिस को सामने करती है, अशा घोषणाबाजी देत संतप्त कार्यकर्त्यांनी सुभेदारी विश्रामगृह परिसरातून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मारली. संघटनेचे नेते रवीकांत तुपेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बोंडअळी बाधित कापूस फेकला. माणिक कदम, विजय भंडे, चंद्रशेखर साळुंखे, मारुती वराडे, संतप रोडगे, मुक्ताराम गव्हाणे, चंद्रकांत कटारे, गुलाम अली, वसंत चोरमले, माऊली मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी तुपेकर यांनी केली. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन करू, त्याची सुरुवात येत्या सात डिसेंबरला जालन्यातून करु, असा इशारा दिला.
बडा म्होरक्या नांदेडचा
पत्रकारांशी बोलताना तुपेकर म्हणाले, ‘भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित असून, बडे उद्योगपतींना धार्जिणे आहे. कर्नाटकात सोयाबीनला साडेतीन हजार भाव तर महाराष्ट्रात दोन हजार २०० रुपयांच्य आत कसा. सरकार म्हणून जमत नसेल, तर मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत. समृद्धी महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचा प्रकार आहे. बनावट रसायने, औषध तयार करणाऱ्या म्होरक्याचे नाव सरकारला सांगितले आहे. सरकारने कारवाई केली नाही तर संघटना नाव उघड करेल. हा बडा म्होरक्या नांदेड परिसरातील आहे.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट