‘सध्या देशाला आक्रमक पुरुषसत्ताक राजकारणाने घेरले आहे, मात्र संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही वाढणारी पितृसत्तेची आक्रमकता थांबू शकते. संविधानाच्या अधिकाराची जाण असल्याने सर्वांचेच जगणे अधिक सुलभ होईल,’ असे प्रतिपादन अॅड. निशा शिऊरकर यांनी केले. ‘महिला आणि कायदे’ या विषयावर त्या बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राने ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ’ या एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा शनिवारी झाली. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, किरण मोघे आणि डॉ. स्मिता अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. मोघे यांनी महिलाविषयक कायद्यावर भाष्य केले. ‘स्त्री प्रश्नांच्या आधारावर चळवळी उभ्या राहतात व त्यातूनच अनेक कायदे निर्माण होतात, मात्र कायदे व दुसऱ्या बाजूला समाजातील स्त्री-पुरूष समतेचे राजकारण होणे गरजेचे आहे,’ असे मोघे म्हणाल्या. दिवसभर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या २०१३ च्या अधिनियमावर सांगोपांग चर्चा झाली. दुपारच्या सत्रात अॅड. गीता देशपांडे यांनी अधिनियामावर मांडणी केली. माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातील डॉ. अपर्णा कोतापल्ले यांनी अंतर्गत समितीत काम करताना आलेले अनुभव सांगितले. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई कशी करता येऊ शकेल यावर चर्चा केली. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीसंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींवर सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी भाष्य केले. यावेळी सजग महिला संघर्ष समितीच्या डॉ. रश्मी बोरीकर आणि विधी विभागाचे प्रा. आनंद देशमुख यांची उपस्थिती होती.
ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. स्मिता अवचार यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. प्रा. अश्विनी मोरे, प्रा. मंजुश्री लांडगे, प्रवीण सरकटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. निर्मला जाधव, संतोष लोखंडे, विकास टाचले, संजय पोळ व विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट