मिटमिटा येथील चिली ढाबा येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सात गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. पण, वेळीच मदत पोचल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा या भागात मोठी जीवितहानी झाली असती.
चिली ढाब्यातील स्वयंपाकी अन्वर पठाण हे स्वंयपाक करताना कढईतील गरम तेलाने अचानक पेट घेतला. ही आग एका सिलिंडरच्या पाइपर्यंत पोहचली. त्यामुळे सिलिंडरने पेट घेतला. पेटलेल्या सिलिंडरच्या शेजारी असलेल्या तीन सिलिंडर त्या पाठोपाठ पेटले. असे करता करता एकूण सात सिलिंडर पेटले. यामुळे येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांनी आरडाओरड करून धावपळ केली. हा आवाज ऐकूण मिटमिटा गावातून काही तरूण व गावकऱ्यांनी धाव घेतली. संपूर्ण गाव व हॉटेलमधील कामगार पाणी, वाळूच्या गोण्या घेवून आगीत फेकत होते.
याची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन अधिकारी भंडारे, डी. डी. साळुंके, एच. वाय. घूगे, रमेश सोनवणे, राजू निकाळजे, वाहनचालक अशोक खोतकर, फायरमन संग्राम मोरे, राम सोनवणे, शेख समीर, शेख तनवीर, शेख आमेर, परमेश्वर साळुंके, भुरेलाल सलामपुरे, अप्पासाहेब गायकवाड, हेमंत कुमावत, कैलास तुपे, गोविंद घोडके आदींनी आग विझवण्यासाठी मदत केली.
आग लागल्यानंतर घटनास्थळी छावणी पोलिस एक तासानंतर पोहोचले. पोलिस निरीक्षक श्रीकांत देशमुख, पीएसआय गिरी, पीएसआय सुरवसे, बीट अंमलदार नागरे यांनी विझवलेले व सिलबंद गॅस सिलिंडर ताब्यात घेतले.
आज ढाबाचालकांची बैठक
या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर शनिवारी सकाळी दहा वाजता छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व ढाबाचालकांची बैठक बोलवण्यात आली आहे.
मदतकार्यामुळे दिलासा
ही आग पसरून गॅस सिलिंडरचे स्फोट झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मिटमिट्याचे गावकरी व तरुणांनी वेळीच धाव घेऊन मदत कार्य केले. अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्यामुळे सिलिंडरची आग पसरली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट