म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धार्मिक कार्यक्रमात गोंधळ का घालतोस, असा जाब विचारणाऱ्याला दगडाने गंभीर स्वरुपाची मारहाण करून डोळा निकामी व चेहरा विद्रुप करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पाचोड तालुक्यातील कडेठाण तांडा क्रमांक दोन येथे २९ जून २०१४ रोजी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. पूजा संपल्यानंतर प्रसाद वाटप सुरू झाल्यावर सोमीनाथ रोहिदास चव्हाण हा दारू पिऊन आला, शिविगाळ करत गोंधळ घालू लागला. त्या ठिकाणी असलेला अंकुश उत्तम चव्हाण याने मध्यस्थी करून शांत राहण्याचे आवाहन केले. तो ऐकत नसल्याचे पाहून अंकुश चव्हाण गावात घरी परत आला. दरम्यान, सोमीनाथ, त्याचे वडील रोहिदास व त्याची आई तुळशाबाई गावात आले आणि घरसमोर अंगणात बसलेल्या अंकुश चव्हाण यास शिविगाळ करीत माराहण केली. या वेळी रोहिदास हा अंकुशच्या छातीवर बसला आणि कपाळावर टोकदार दगडाने मारले. यामध्ये त्याच्या डोळ्याला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी असलेल्या अंकुशला तातडीने उपचारासाठी पाचोड प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले. नंतर घाटीत व त्यानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकारात अंकुश चव्हाण याचा डोळा पूर्ण निकामी झाला आणि कपाळाला मोठी खोच पडून चेहरा विद्रुप झाल्याचे लहू उत्तम चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले. तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात सोमीनाथ रोहिदास चव्हाण, रोहिदास रामदास चव्हाण व तुळशाबाई चव्हाण या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
साडेतीन हजार रुपये दंड
खटल्यावेळी, सहायक लोकअभियोक्ता बी. आर लोया यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने कलम ३०७ अन्वये राठोड कुटुंबातील तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी, कलम ३२३ अन्वये तीन महिने कारावास व प्रत्येकी २०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट