म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील सुमारे दीड लाखांवर अनधिकृत घरे अधिकृत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार महापालिकेने ३० जूनपर्यंत संबंधितांकडून प्रस्ताव मागवले आहेत.
राज्यातील प्रत्येक शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. '२० बाय ३०' आकाराचे प्लॉट करून त्यावर वसाहती उभारण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. एकदा वसाहती निर्माण झाल्यावर त्यांना मूलभूत सोईसुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेवर येते. त्यामुळे सुविधांवर ताण पडतो आणि अधिकृत वसाहती, बांधकामांवर त्याचा परिणाम होतो. काही राजकीय व्यक्ती किंवा पक्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सरकारवर दबाव आणतात आणि आपापल्या भागातील बांधकामे अधिकृत करून घेतात. उल्हासनगरचे उदाहरण यासंदर्भात राज्य शासनाच्या समोर होते. अशाच प्रकारची मागणी राज्याच्या सर्व जिल्ह्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने सात ऑक्टोबर २०१७ रोजी आदेश काढून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत (नियमित) करण्याचा निर्णय घेतला. या आदेशाच्या प्रती राज्यातील सर्व महापालिका व नगर पालिकांना पाठवण्यात आल्या.
३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे नियमित करण्याची जबाबदारी महापालिकेच्या नगररचना विभागावर टाकण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांना विशिष्ट प्रकारची मुदत देऊन त्यांनी केलेली बांधकामे नियमित करून द्या, असे शासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेच्या नगररचना विभागाने ३० जून २०१८पर्यंत बांधकामे नियमित करण्याचे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन केले आहे. महापालिकेच्या मान्यताप्राप्त आर्किटेक्टच्या माध्यमातून प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. प्रस्तावासाठीचा अर्ज महापालिकेच्या नगररचना विभागातून प्राप्त होऊ शकणार आहे. त्याशिवाय महापालिकेच्या वेबसाइटवर देखील याची माहिती देण्यात आली आहे. ३० जूननंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील गुंठेवारी भाग आणि ले-आउटची बंधने न पाळता करण्यात आलेली बांधकामे अनधिकृत स्वरुपाच्या बांधकामात मोडतात. यापैकी १५ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे आता नियमित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केवळ दहा प्रस्ताव
सरकारने यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी सर्व महापालिकांकडे माहिती मागविली होती. औरंगाबाद शहरात आतापर्यंत केवळ दहा प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुंठेवारीच्या एकूण वसाहती : १२७
गुंठेवारी भागातील घरांची संख्या : सुमारे १ लाख ७ हजार
गुंठेवारी भागातील लोकसंख्या : सुमारे ३ लाख ७५ हजार
महापालिकेच्या लेखी अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या : १ लाख ३५ हजार
(जेवढे अनधिकृत नळ कनेक्शन्स तेवढीच अनधिकृत बांधकामे असे मानले जात आहे)
नियमितीकरणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
- आर्किटेक्टमार्फत विहीत नमुन्यातील अर्ज
- मालकी हक्काची कागदपत्रे
- बांधकाम ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीचे असल्याचा पुरावा
- स्ट्रक्चरल स्टॅबलिटी प्रमाणपत्र
- अनधिकृत बांधकामाचे नकाशे
- बांधकाम २०१५ पूर्वीचे असल्याचे स्वयं घोषणापत्र
- मालमत्ताकर, पाणीपट्टीचे बेबाकी प्रमाणपत्र
- १६ मीटरपेक्षा जास्त उंच इमारत असल्यास अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र
- बांधकाम विकास योजनेच्या रस्त्याला लागून असल्यास किंवा आरक्षणाच्या लगत असल्यास सिटी सर्व्हेकडील मोजणी नकाशा