म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी परिसरातील दूषित पाण्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल दहा ते बारा हजार नागरिकांना गॅस्ट्रो उद्रेकाचा फटका बसला होता आणि म्हणूनच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन थेट मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत दिले होते, मात्र घटनेच्या सहा महिन्यानंतरही कोणावर कारवाई न होता केवळ तिघांना तंबी देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. अर्थात, छावणी परिषदेच्या मंगळवारी (२९ मे) झालेल्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणात केलेली कारवाई जाहीर करण्याचे आदेश अध्यक्षांनी मुख्य कार्य अधिकारी यांना दिल्यानंतर, तिघांवर 'तंबी रुपी कारवाई' करण्यात आल्याचे सीईओंनी स्पष्ट केले.
छावणी परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी परिषदेच्या सभागृहात झाली. परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा, उपाध्यक्ष प्रशांत तारगे यांच्यासह सर्व सात नगरसेवक तसेच नियुक्त सदस्य उपस्थित होते. सभेत सुरुवातीच्या टप्प्यातच गॅस्ट्रो प्रकरणावर काय कारवाई झाली, हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर सीईओ विजयकुमार नायर यांनी दोन अभियंते व एका स्वच्छता निरीक्षकावर कारवाई झाल्याचे सभेत सांगितले, मात्र नेमकी कोणती कारवाई झाली, याविषयी सभेत विचारणा झाल्यानंतर 'झालेली कारवाई जाहीर करा' असे अध्यक्षांनी सीईओंना आदेश दिले. त्यानंतर सीईओंनी दोन अभियंते व स्वच्छता निरीक्षकाला तंबी (सेन्शुअर) देण्याची कारवाई केल्याचे सांगितले. छावणीच्या टोल नाक्यांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाते आणि दररोज लाखोंची लूट केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन, महिन्याभरात तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. या संदर्भात, प्रत्येक टोल नाक्यावर दुपटी-तिपटीने लूट केली जात असून, लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या रजनी सत्यनारायण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
\Bनवीन जलवाहिनीला लागणार महिना\B
कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनी तयार करण्याचे आदेश नोव्हेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत देण्यात आले होते, मात्र सहा महिने लोटले तरी अजूनही जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नाही आणि हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एखाद्या महिन्याचा कालावधी लागू शकतो, असेही सीईओंनी स्पष्ट केले; तसेच पाच वॉर्डांतील अंतर्गत जलवाहिनी बदलण्यासाठी अडीच ते तीन कोटींच्या निधीची आवश्यकता असून, या निधीची प्रतीक्षा आहे, असेही सीईओंनी सांगितले.
\Bपुन्हा अनेक वॉर्डांत दूषित पाणी\B
याच सभेत अनेक वॉर्डांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरसेवक रफत बेग, नगरसेवक शेख हनीफ, नगरसेवक किशोर कच्छवाह व इतरांनी केली. अंतर्गत जलवाहिनी खूप जुनी व जीर्ण झाल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे मत अभियंत्याने सांगितले.