मेनलीड (फोटो वेगळ्या फाइलमध्ये सोडले आहेत.)
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :
बारापुल्ला गेट, मकाई गेट आणि महेमूद दरवाजा (पानचक्कीचा पूल) येथील तीनही ऐतिहासिक पुलांकडे महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पश्चिम औरंगाबादला जोडणारे हे तीनही पूल धोकादायक झाले आहेत, तरीही त्यावरून दररोज सुमारे दीड लाख नागरिकांची ये-जा सुरू असते. या पुलांच्या दुरुस्तीचे मात्र पालिका नाव घेत नाही.
जुन्या औरंगाबाद शहरातून पश्चिम भागाकडे शहराबाहेर जाण्यासाठी खाम नदीवरून तीन पुल बांधण्यात आले होते. यात बारापुल्ला गेट, मकाई गेट आणि महेमूद दरवाजा पानचक्कीचा पूल या तीन पुलांचा समावेश आहे. या पुलांचे वय आता ३०० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. हे दगडी पूल जुन्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. या पुलांचे काही भाग पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांचे वय संपल्याचे जाहीर केले होते. यानंतर महानगर पालिकेनेही पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले. या पुलांचा वापर जड वाहतूकीसाठी करून नये, अशी सूचनाही काढण्यात आली होती. शहर वाहतूक पोलिसांनी धोकादायक पुलावरून जडवाहनांची वाहतूक बंद केली होती. यानंतर या पुलावरून बससह अन्य मोठ्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बारापुला गेटवरून टिप्पर आणि छोट्या आकाराच्या ट्रकची वाहतूक होत असल्याने या पुलांच्या बाहेर लोखंडी पोल लावण्यात आले आहेत.
ऐतिहासिक पुलांची कालमर्यादा संपल्याने पर्यायी पूल उभारावा, या मागणीसाठी शहरातील इकबालसिंग गिल यांनी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. तसेच तत्कालीन नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनीही पुलाचे काम सुरू करा, या मागणीसाठी उपोषण केले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही पूल तयार करण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बारापुल्ला गेटच्या बाहेर असलेला हा पूल काही ठिकाणी कमकुवत झालेला आहे. शिवाय खालच्या भागातूनही वाहतूक सूरू आहे. महेमूद दरवाजाच्या बाहेरचा पूल आणि मकाई गेट या पुलांचीही अवस्था खराब झाली आहे.
…………
असा होतो वापर
बारापुला या पुलावरून दररोज छावणी, भावसिंगपुरा, भीमनगर, नंदनवन कॉलनी, मिलिंद नगरसह वाळूज, दौलताबादकडे शहरातून जाणारी वाहने जात असतात. तर महेमूद दरवाज्याच्या पुलावरून विद्यापीठ, मिलिंद इंजिनीअरिंग कॉलेजसह आंबेडकर लॉ कॉलेजकडे जाणारी वाहने जात असतात. मकाई गेट या पुलाचा वापर हा बेगमपुरा या भागात राहणाऱ्या नागरिकांचा हा रस्ता आहे. या पुलावरून हजारो छोटी वाहने दररोज जात असतात.
……………
असे झाले पयत्न
तत्कालीन आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या काळात तीन ऐतिहासिक पुलांना पर्यायी पूल बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याबाबत तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय मांडला होता. अजित पवार यांनी ११ कोटी रुपये पुलासाठी देण्याची घोषणा केली होती. यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव देण्याबाबत सूचना केली होती. महापालिकेने प्रस्ताव देण्यास उशीर केला. यामुळे किंमती वाढल्या तसेच तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासनाकडून एक रुपयाही पुलांसाठी मिळाला नाही.
…………………
खाम नदीला पूर असल्यास पुलाचे होऊ शकते नुकसान
वर्ष २००५ ला शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन खाम नदीला मोठा पूर आला होता. पूर ओसरल्यानंतर पूल जीर्ण झाल्याचे लक्षात आले होते. यंदाही मोठा पाऊस होऊन खाम नदीला पूर आल्यास पुलाची अवस्था आणखी खराब होऊ शकते.
……………
कोट
मागील दोन वर्षांपासून विधानसभेसह राज्यपातळीवर या तीनही पुलांच्या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. महाड पूल तुटल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही औरंगाबादच्या या पुलाच्या विषयाबाबत कल्पना देण्यात आली होती. या पाठपुराव्यानंतरही महापालिकेकडून कोणताही प्रतिसाद नव्हता. मकाई गेटच्या सौंदर्यीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र, पुढे काहीही पाऊल उचलले गेले नाही. या प्रकरणात आता पीडब्ल्युडीने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यासह संबंधित विभागाला पाठविण्यात आला आहे. या पुलामुळे जर कोणताही अपघात घडला यासाठी महापालिका आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील.
आमदार इम्तियाज जलील
………
पाठपुरावा करावा
दीड लाख लोकसंख्या असलेल्या भागाचा हा महत्त्वाचा विषय आहे. याबाबत विधानसभेत आवाज उचलला होता. तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांनी ११ कोटी रुपये जाहीर केले होते. हे पैसे का आले नाही? याची विचारणा आताच्या आमदारांनी विधानसभेच्या विशेष कमिटीला करायला हवी. महापालिकेच्या हद्दीमधीला हा महत्त्वाचा विषय असताना, याकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यांनी वेळीच या पुलांना पर्यायी रस्त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडून निधीची मागणी केली असती तर हा प्रश्न मिटला असता. या पुलाला पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी कार्यवाही लवकरात लवकर करून या भागातील जनतेला जाण्याची सोय व्हायला हवी.
माजी आमदार प्रदिप जैस्वाल