…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जडवाहनांना थांबण्यासाठी शहरालगतच ट्रान्सपोर्ट नगरी तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार सप्टेंबर २०१६ रोजी केली. या घोषणेला दोन वर्षे पूर्ण झाली. मात्र, करोडी येथे ट्रान्सपोर्ट नगरी तयार करण्याबाबतची प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोडी येथील गट क्रमांक २४मधील ९० एकर जागेपैकी काही जागा 'ट्रान्सपोर्ट हब'साठी जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. विशेष म्हणजे या गट क्रमांकामध्येच औरंगाबाद आरटीओ कार्यालय, महापालिका, महावितरण, विधी विद्यापीठासह इतर दोन संस्थांना जागा देण्यात आली आहे. याच गटात मराठा व महार या समाजाच्या स्मशानभूमीसाठीही जागा देण्यात आली आहे. आता या गटातील पाच ते दहा एकर जागेवर अतिक्रमण आहे. करोडी येथे प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हबची जागा औरंगाबाद - नाशिक रोडपासून साडेतीन किलोमीटरवर आहे. तसेच 'एएस क्लब'पासून हे अंतर ३०० मीटर आहे. यामुळे करोडीची जागा ट्रान्सपोर्ट नगरीसाठी उपयुक्त मानून, या जागेवर ट्रान्सपोर्ट नगरी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ट्रान्सपोर्ट नगरीसाठी विधी विदयापीठाच्या बाजूची जमीन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. आता विधी विदयापीठ वाल्मी जवळ तयार व्हावे, अशी मागणी विदयापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे विधी विदयापीठाची जागा ट्रान्सपोर्ट नगरीसाठी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ट्रान्सपोर्ट नगरीसाठी महसूल विभागाकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे दोन वर्षानंतरही मुख्यमंत्र्यांची ट्रान्सपोर्ट हब साठी जागा देण्याची घोषणा हवेतच विरलेली आहे. \Bकंटेनर डेपो उभारला \Bकरोडीपासून काही अंतरावर दौलताबादच्या माळीवाडा येथे कंटेनर डेपो उभारण्यात आला आहे. या कंटेनर डेपोचाही विस्तार होणार आहे. रेल्वे लाइन जवळ असल्याकारणाने याचा फायदा स्थानिक टान्सपोर्टर्सला मिळेल. याशिवाय एनएच २११, तसेच नागपूर मुंबई एक्सप्रेस वे झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढणार आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी ट्रान्सपोर्ट नगर येथे थांबू शकतील. \B...अशी आहे संकल्पना \Bट्रान्सपोर्ट हब महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळच्या माध्यमातून उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हबमध्ये औरंगाबाद शहरातील ट्रान्सपोर्टर्सचे गोदाम, या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक थांबण्यासाठी पार्किंग, तसेच छोटया वाहनांसाठी जागा, बॉडी बिल्डिंगचे गॅरेज, गॅरेज, अॅटो पार्टस विक्रीची दुकाने, वजन काटा, याशिवाय वाहन चालकांसाठी विश्रांतीगृहे, हॉटेल, स्वच्छता गृहे, सिनेमागृह उभारण्याचाही निर्णय प्रस्ताव तयार करताना घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या भागात रोजगारामध्ये वाढ होईल. विधी विद्यापीठाची जागा ट्रान्सपोर्ट नगरीसाठी देण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, कायदेशीर अडचणी आल्याने सध्या हा प्रस्ताव विचाराधीन आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल. \B- बालाजी क्षीरसागर, तहसीलदार, औरंगाबाद \B
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट