म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : दरवर्षी सौदी अरेबिया येथे यात्रेकरूंना हज कमीटीच्या माध्यमातून हज यात्रेला पाठविले जाते. हज यात्रेशिवाय सौदी अरेबियाला पवित्र शहर मक्का येथे मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. उमराहला जाणाऱ्या भाविकांसाठी हज कमिटीच्या वतीने आगामी काळात नियोजन करण्याचा विचार सुरू आहे. औरंगाबाद विमानतळावरून दरवर्षी हज यात्रेला दोन ते अडीच हजारावर हाजी जातात. दरवर्षी या यात्रेसाठी औरंगाबादहून पाच ते आठ हजाराच्यावर अर्ज दाखल होत असतात. ज्यांना हज यात्रेला जाणे शक्य होत नाही, असे भाविक वर्षभरात केव्हाही सौदी अरेबिया येथे मक्का आणि मदिना येथे जात असतात. याला उमराह म्हटले जाते. उमराह यात्रेचे आयोजन अनेक खासगी टूर्स ऑपरेटर करतात. हज यात्रेच्या दरम्यान येणाऱ्या खर्चापेक्षा निम्म्या खर्चात उमराहचा खर्च होतो. हज कमिटीच्या वतीने उमराह यात्रेचेही नियोजन करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. मात्र, हज कमिटीकडून याबाबत विचार करण्यात आलेला नव्हता. शिवाय ही वर्षभर केली जाणारी प्रक्रिया असून यासाठी तेवढे मनुष्यबळ हज कमिटीकडे नाही. यामुळे याबाबत अद्याप विचार झाला नव्हता. आता हज कमीटीचे अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांनी उमराह यात्रेच्या नियोजनाबाबत हज कमिटीकडून विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. केंद्र आणि राज्य स्तरावर हा प्रयत्न सुरू आहे. खासगी टूर्सपेक्षा हज कमिटीचा उमराहचा खर्च कमी असेल, असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सरताज खान, अलहाज रहेनुमाईचे अध्यक्ष अहेमद पटणी, सचिव सय्यद साबेर, जिल्हा हज कमिटी उपाध्यक्ष अब्दुल कय्यूम, दौलत पठाण, शाकेर राजा, नबी पटेल, फारूख पठाण, जाकिया बानो, मुख्तार खान आदींची उपस्थिती होती. …
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट