मराठवाड्यात जून महिन्यातील दमदार पावसामुळे १८०० च्या पलिकडे गेलेला पिण्याच्या पाण्याचा टँकरचा आकडा निम्मा झाला होता. मात्र एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे टँकरची संख्या पुन्हा वाढत आहे. गेल्या आठवड्यात उन्हाचा चटका वाढल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एका आठवड्यात टँकरची संख्या १३६ ने वाढली. मराठवाड्यात ७३६ गावे व ३९१ वाड्यांना ९९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस आठ जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या १८६० होती. मात्र त्यानंतर मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने चार जिल्ह्यांत दमदार हजेरी लावली. परिणामी टँकरची संख्या कमी होत गेली. २० जून रोजी ११३२, २९ जून रोजी १००३ व ६ जुलै रोजी टँकरच्या संख्या ८६३ पर्यंत कमी झाली होती. त्यानंतर पुन्हा टँकरची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. सध्या मराठवाड्यात ९९९ टँकरने पाणी पुरवले जात आहे. जून महिन्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात होते, त्यानंतर ही संख्या तीनवर आली. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील ६४ गावांना ८१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ४७८ टँकर बीड जिल्ह्यात सुरू आहेत.
पावसानंतरही विभागात ३३७६ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ४९, जालना ११२, परभणी २८९, हिंगोली ३०, नांदेड ४१९, बीड ८११, लातूर ८३० व उस्मानाबाद जिल्ह्यात ८३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात १४० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय टँकर
औरंगाबाद - ८१
जालना - ६४
परभणी - २१
हिंगोली - ३
नांदेड - १११
बीड - ४७८
लातूर - ९२
उस्मानाबाद - १४९
एकूण - ९९९
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट