'शेतीमालाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतीची समस्या हा कॅन्सर असून पेनकिलर उपयोगाचे नाही. रोग समूळ हटवण्यासाठी योग्य उपचार पाहिजे,' असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले. 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या - कारणे आणि उपाययोजना या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते गुरुवारी बोलत होते.
माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे विधी संशोधन केंद्र व आविष्कार संशोधन मंच यांच्या वतीने 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या - कारणे आणि उपाययोजना' या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. तापडिया नाट्यमंदिरात तीन सत्रात झालेल्या कार्यशाळेत मान्यवर वक्त्यांनी सहभाग घेतला. 'शेतकरी आत्महत्या आणि कायदेशीर बाबी' या विषयावरील पहिल्या सत्रात अॅड. दिनेश शर्मा व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी सहभाग घेतला. शेतीच्या अर्थकारणावर पाटील यांनी सडेतोड मते मांडली. 'एक क्विंटल कापूस उत्पादनासाठी सहा हजार ४५ रुपये खर्च येतो. तर चार हजार रूपये भाव असतो. या परिस्थितीत शेतकरी टिकणे कठीण आहे. शेतीच्या समस्या कॅन्सर आहेत. पेनकिलकर देऊन आजार दूर होणार नाही. तर वेगवेगळे योग्य उपचार करूनच रोग हटवता येईल,' असे पाटील म्हणाले. यावेळी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासकांना प्रश्न विचारले. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून आडत वसूल करू नये असा निर्णय २० डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात आला; मात्र व्यापाऱ्यांनी शासनावर दबाव आणून दोन दिवसात निर्णय रद्द केला. या धोरणाबाबत विजय राऊत या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. यावर अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांनी उत्तर दिले. 'आडत प्रश्नावर राज्य सरकारने फेब्रुवारीत समिती नेमली. मात्र, आडत रद्द झाल्यास संपावर जाऊ अशी धमकी व्यापाऱ्यांनी दिली होती. या धमकीला घाबरून सरकारने निर्णय घेतला नाही,' असे पाटील यांनी सांगितले.
'व्यक्तीगत सामाजिक जबाबदारी' या विषयावर प्रा. जयदेव डोळे यांनी विचार मांडले. 'वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी गायब झाला आहे. चित्रपट व मालिकातून हद्दपार झाला. वर्तमानपत्रातही आतल्या पानावर ढकलला गेला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे तरुणांनी सोशल मीडियातून दबावगट निर्माण करावा' असे प्रा. डोळे म्हणाले. दरम्यान, या कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय उपायुक्त डॉ. विजयकुमार फड व एम. एल. अँड जी. ई. सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. जे. के. वासडीकर यांनी केले. कार्यशाळेत अॅड. दिनेश शर्मा, गुणवंत पाटील, अरुंधती पाटील, अॅड. विष्णू ढोबळे, डॉ. गिरधर पाटील, प्रा. जयदेव डोळे व सुनिता तगारे यांनी विचार मांडले. अॅड. उमाकांत पाटील यांच्या उपस्थितीत समारोप झाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट