'दहा हजारांचे मोबाइल, महागड्या गाड्या वापरता, मग तुम्हाला शुल्कमाफी हवी कशाला, २० एकर बागायती जमिनीवाले असणारेही शुल्कमाफी मागत आहेत,' अशी मुक्ताफळे शुल्कमाफीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी उधळली. विविध कॉलेजांच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना सडेतोड उत्तर देत, त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षाशुल्क शासनाने माफ केले, परंतु त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. याच मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराओ घालत निवेदन सादर केले. परीक्षा शुल्कमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, शैक्षणिक शुल्कमाफ करावी, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांना उत्तर देताना कुलगुरूंनी शुल्कमाफ करण्यास असर्थतता दर्शविली. ते म्हणाले,'मुलं दहा हजाराच मोबाइल वापरतात, महागड्या गाड्या आहेत आणि फी माफी मागतात. वीस एकर बागायती आहे आणि शुल्कमाफी मागता.'
कुलगुरूंच्या या वक्तव्यांचा विद्यार्थ्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. मराठवाड्यात पाणीच नाही तर, बागायती जमीन येणार कोठून? सगळ्यांना एका तराजूत कशाला मोजता, असा सवालही विद्यार्थ्यांनी केला. 'तुमच्या प्राचार्यांना विचारून तुम्ही आला का? त्यांना बोलवा,' असे कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना म्हणाले. त्यानंतर विद्यार्थांनी कुलगुरूंच्या निषेधाच्या घोषणा देत विद्यापीठ दणाणून सोडले.
प्राचार्यांना पत्र लिहणार
विद्यार्थ्यांचा संताप पाहता कुलगुरूंनी सारवासारव केली. सगळ्या प्राचार्यांना लिहून दुष्काळग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाईल व त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जातील. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही हा प्रश्न ठेवला जाईल असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले.
मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहे. अशावेळी कुलगुरूंचे हे वक्तव्य असंवेदनशीलता दर्शविणारे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्कमाफीसाठी वेगळी तरतूद करून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला. शासनाने परीक्षा शुल्कमाफी केली, परंतु विद्यापीठ प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न केल्याने विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात आले. त्याची दखल घेण्यापेक्षा तेच असे विधाने करतायेत हे योग्य नाही.
- संग्राम कोते पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट