दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजना जाहीर केली, मात्र औरंगाबाद जिल्ह्यात या योजनेची कामे संथगतीने सुरू अाहेत. जिल्ह्यात १३०२ कामे सरकारी भाषेत 'प्रगतीपथा'वर आहेत. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच अभियानाअंतर्गत पहिल्या वर्षातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरची डेडलाइन दिली असल्याने त्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. २०१५-२०१६साठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २२८ गावांची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या या योजनेमध्ये ५४०० कामांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते, मात्र जिल्ह्यात कासवगतीने सुरू अाहेत. या कामांमध्ये फारशी प्रगती नसून, आतापर्यंत यातील ४०९८ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १३०२ कामे अद्यापही सरकारी भाषेत प्रगतीपथावर आहेत. यानुसार औरंगाबाद तालुक्यात ५८३, पैठण ४७१, फुलंब्री १९४, वैजापूर २८३, गंगापूर ६४३, खुलताबाद १७२, सिल्लोड ९५०, कन्नड ५०५ तर, सोयगाव तालुक्यात पूर्ण झालेल्या २९७ व इतर अपूर्ण कामांवर आतापर्यंत ६० कोटी १५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. लोकसहभागातून झालेल्या कामांचाही वाटा मोठा असून, तो खर्चात समाविष्ट करण्यात आलेला नाही. पूर्ण झालेल्या कामांमध्ये कंपार्टमेंट बंडिंग ७९१ (९२ अपूर्ण), मातीनालाबांध २०४ (१४ अपूर्ण), खोल सलग चर २७२ (३३ अपूर्ण), साखळी सिमेंट बंधारा २२० (५१ अपूर्ण), विहीर फेरभरण ४९२ (४५४ अपूर्ण) यांसह इतर कामे झाले अाहेत. अभियानातून झालेल्या या कामांमुळे २६९५१ हेक्टर क्षेत्राला फायदा झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
पुढचे पाठ मागचे सपाट...
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नवीन वर्षासाठी २२३ गावे निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र गेल्या वर्षीचीच कामे अद्यापही अपूर्ण असल्यामुळे 'पुढचे पाठ मागचे सपाट' अशी अवस्था झाली आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गेल्यावर्षी २२८ गावांची निवड करण्यात आली होती, मात्र यंदा जिल्ह्यात २२३ गावे निवडण्यात येणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट