Manoj.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः सरकारने मोठा गाजावाजा करत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून जिल्हा परिषद शाळांत शालेय पोषण आहार सुरू केला. निवडणुका आला की, प्रचारात टिमकी वाजवण्यापुरती या योजनेची आठवण येते, मात्र जिल्ह्यातील फर्दापूर तांडा जिल्हा परिषद शाळेला अनेकदा किडके धान्य पुरवण्यात येते. धान्याच्या गोण्या कमी वजनाच्या असतात. धान्य संपले, की दोन-दोन कधी चार-चार महिने योजना बंद असते. मग या आहारातून मुलांचे पोषण होणार की शोषण, असा सवाल गावकरी करत आहेत.
सरकारी योजना, तिचा हेतू चांगला असतो. मात्र, अंमलबजावणीत घोडे पेंड खाते. तशीच गत या योजनेची झाली आहे. फर्दापूर तांड्यावर इयत्ता चौधीपर्यंत शाळा आहे. या शाळेची १८ ऑगस्ट रोजी पाहणी केली. येथे रोज एकूण ८८ विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना खरेतर शालेय पोषण आहार योजना एक वरदान ठरणारी आहे, मात्र अंमलबजावणीत होणाऱ्या कुचराईमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या योजनेस पुरविण्यात येणारे धान्य अत्यंत हलक्या प्रतीचे असते. बऱ्याचदा दाळ आणि तांदळाला कीड लागलेली असते. हे धान्य बदलून मिळत नाही. मग नाईलाजाने याच धान्याची खिचडी विद्यार्थ्यांना शिजवून द्यावी लागते. बर ही सरकारी योजना, याबद्दल तक्रार करायची तर कुणाकडे, असा प्रश्न बचतगट चालकांना आणि शिक्षकांना पडतो. विशेष म्हणजे सरकार दरबारकडून मिळणारा धान्य पुरवठा अचानक बंद होतो. तुळसाबाई पंढरी चव्हाण यांनी या बचत गटाचे कंत्राट घेतले आहे. त्यांच्या घरची परिस्थितीही हलाकीची. जिथे स्वतःच्या पोटची भ्रांत तिथे ८८ विद्यार्थ्यांना काय खाऊ घालणार. मग अशा वेळी धान्य येईपर्यंत पोषण आहार योजना बंद असते. जवळपास दोन-दोन तर अनेकदा चार-चार महिन्यात शाळेत खिचडी शिजतच नाही.
बालविवाहाचे प्रमाण जास्त
शाळेतील मुलींचे शिक्षण खूप लवकर बंद होते. अनेक मुली चौथीनंतर शाळेसाठी दुसऱ्या गावाला जात नाहीत. त्यांची घरकाम आणि शेतकामात मदत घेतली जाते. पोषण आहारामुळे उपस्थितीचा पट वाढला आहे. मात्र, यातल्या बहुतांशी मुली माध्यमिक शिक्षणही पूर्ण करत नाही. अनेक मुलांची चौदाव्या, पंधराव्या वर्षीच लग्ने केली जातात. ही चिंताजनक बाब आहे.
गोण्यात मारतात काटा
पोषण आहारासाठी धान्य पाठविताना ५० किलोच्या गोण्या पाठविण्यात येतात, मात्र बहुतांश गोण्यांमध्ये फक्त ४० किलो धान्य असते. डाळीचे दर गगनाला भिडले आहेत. तांदूळही महाग आहे. प्रत्येक वेळेस या धान्य वाटपाच्या मापात पाप कोण करते, याचे उत्तर ना इथल्या शिक्षकाला मिळाले आहे, ना बचत गटाला. शिक्षण विभागाकडून या मापाची चौकशी व्हावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.
मुलांची गळती गंभीर
शाळेत येणारी बहुतांशी मुले ही बंजारा समाजातील आहेत. ऊसतोड हंगाम सुरू झाला, की पालक कामावर जातात. मग विद्यार्थ्यांची शाळा बंद पडते. एकतर चिमुकल्या हातात पोटामुळे कोयता येतो, किंवा घरात लहान मुलांचा सांभाळ करत या विद्यार्थ्यांना थांबावे लागते. अनेकदा मुले पालकांसोबत दुसऱ्या गावी मोलमजुरीसाठी स्थलांतर करतात. सहा महिने जवळपास ५० टक्के मुले शाळेतच येत नाहीत. या मुलांना सातवीपर्यंत नापासही करता येत नाही. ती पास होतात, मात्र परिस्थितीने त्यांचे शिक्षण हिरावून घेतलेले असते. शालेय पोषण आहार योजना चांगल्या पद्धतीने राबविली, तर राज्यातील अशा हजारो मुलांचे कल्याण नक्कीच होणार आहे.
भाषेची समस्या
फर्दापूर तांडा येथील शाळेत भाषेची समस्या गंभीर आहे. शाळेत येणारी बहुतांश मुले बंजारा समाजातील आहेत. त्यांची मातृभाषा वेगळी. त्यामुळे पहिलीपासून मराठी शिकवताना शिक्षकांना अडचण येते. अनेकदा विद्यार्थ्यांना शिक्षकांना काय शिकवायचे तेच समजत नाही. जे शिकवलेले असते ते पेपरमध्ये लिहता येत नाही. विद्यार्थी उत्तर व्यवस्थित देतात, मात्र त्यांना कागदावर उतरविणे अवघड जाते. ज्या शाळेत बंजारा शिक्षक आहेत, तिथे ही समस्या कमी जाणवते.
शिजवून द्यावे वाटत नाही
अनेकदा पुरविण्यात येणारा तांदूळ आणि डाळ इतकी खराब असते, की विचारूच नका. तांदळाचे पीठ झालेले असते. त्यात जाळ्या, अळ्या, नुशा असतात. दाळीचीही हीच गत असते. बचत गटाला हे अन्न विद्यार्थ्यांना शिजवून द्यायलाही अंगावर काटा येतो. कारण त्यांचीही मुले याच शाळेच शिकतात. खिचडीचे धान्य शेवटी किती धुणार. त्यामुळे ही योजना चालवायची असेल, तर चांगल्या प्रतीच्या धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
चव ना ढव; भाजी-मसाला दुर्मिळ
विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारी खिचडी अतिशय बेचव असते. भाजीपाल्यासाठी पैसे मिळत नाहीत. मसाल्यासाठीही कमी पैसे मिळतात. त्यात जितका मसाला येईल, तितकाच आणला जातो. त्यामुळे खिचडीला फक्त पिवळ्या पाण्याची फोडणी दिलेली असते. 'हे विद्यार्थी गरीब असल्यामुळे खातात. अन्यथा ते यांनी या खिचडीकडे ढुंकूनही पाहिले नसते,' अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
शिक्षकांनी केले शाळेला कुंपण
शाळेत सध्या जे. पी. कोळी, डी. एस. बावस्कर आणि बी. आर. गावित हे तीन शिक्षक आहेत. शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे हे तिघेच चार वर्ग सांभाळतात. शाळेला कुंपण नसल्यामुळे गावातील गुरे-ढोरे शाळा परिसरात घुसायची. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून शाळेला कुंपण घातले. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बंजारा समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लावली. याबद्दल गावकरी शिक्षकांचे कौतुक करतात, मात्र अजूनही शाळेत विजेची सोय नाही. त्यामुळे अनेक कामात अडचण येते.
शाळेय पोषण आहार योजनेचा मोठा बोलबाला करण्यात आला. मात्र, आमच्या शाळेत अनेकदा किडके धान्य येते. डाळ, तांदूळ हलक्या प्रतीचे असते. आमची मुले गरीब म्हणून असा भेदभाव केला जातो का? अशा योजनेतून मुलांचे पालन-पोषण होणार तरी कसे?
- भगवान चौहान, ग्रामस्थ, फर्दापूर तांडा
फर्दापूर तांडा शाळेतील शिक्षक चांगले आहेत, मात्र येथे एक शिक्षक कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. या शिक्षकाची लवकरात लवकर भरती करावी. शालेय पोषण आहार योजनेत देण्यात येणाऱ्या खिचडीचा दर्जा सुधारण्यात यावा.
- नामदेव चौहान, ग्रामस्थ, फर्दापूर तांडा
आमचे सगळेच सर खूप चांगले शिकवतात. आम्हाला मराठी लिहिण्यात अनेकदा अडचण येते. काही-काही शब्द समजत नाहीत. तेव्हा सर आमच्या भाषेतून हे शब्द आम्हाला सांगतात. आमची शाळा बंद होऊ नये, यासाठी आमच्या घरी येऊन सरांनी ताकीद दिली.
- करिना चौहान, विद्यार्थिनी, फर्दापूर तांडा
आम्हाला मराठी आता चांगले समजते. मात्र, बऱ्याचदा लिहिण्यात अडचण येते. आमच्या घरी शिकलेले कोणी नाही. आई-वडील मजुरी करतात. अनेकदा घरकामासांठी आमच्या मैत्रिणींनी शाळा बुडवावी लागते. अनेक मैत्रिणी घरातल्यांसोबत कामासाठी शेतात जातात.
- नंदिनी चौहान, विद्यार्थिनी, फर्दापूर तांडा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट