म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या जटवाड्यातील नागरिकांना अंतर्गत रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य आदी नागरी प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. भाजीपाला विक्री, दुग्ध व्यवसायामुळे येथील ग्रामस्थांचा औरंगाबाद शहराशी रोजचाच संबंध येतो. झालर क्षेत्रातील या गावाचा अद्यापही विकास न झाल्याने सिडकोपेक्षा महापालिकाच बरी, अशी भावनाही काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अर्थात, करवाढ होऊ नये, असेही ते नमूद करतात.
खाम नदीच्या काठावर वसलेले जटवाडा हे गाव शहरातील मध्यवर्ती कारागृहापासून (हर्सूल) दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे. तेथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले हे गाव विकासापासून मात्र दूरच आहे. गावाची लोकसंख्या सुमारे सव्वातीन हजारच्या आसपास असून, हिंदू, मुस्लिम, बौद्ध नागरिक येथे गुण्यागोविंदाने राहतात. सर्वसाधारण, अल्प उत्पन्न गटांतील ग्रामस्थांची संख्या जास्त आहे.
दळणवळणाची सोय नाही
जटवाडा हे गाव खुलताबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. खुलताबाद, कन्नडला जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून हा मार्ग ओळखला जातो. जोगवाडा, धारताडा वस्ती यांसह अनेक गावांना याच मार्गाने जावे लागते. हर्सूल कारागृह ते जटवाडा हा रस्ता सुस्थितीत असला, तरी त्यापुढील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. २० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. रस्ता एवढा उखडला आहे, की अनेक वाहनधारकांना त्या रस्त्याने हॉस्पिटलची वाट दाखविली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. जटवाडा हे गाव तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांची येथे नेहमी वर्दळ असते. ग्रामस्थांचाही औरंगाबादसह परिसरातील गावांशी रोजचा संबंध आहे, पण येथे एसटी महामंडळाने बस सुरू केली नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खासगी वाहनाशिवाय येथील नागरिकांना दुसरा पर्याय नाही. बहुतेक ग्रामस्थांना दुचाकीचा वापर करावा लागतो.
शेतीवर उदरनिर्वाह
शेती हेच येथील नागरिकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. गावाचे एकूण क्षेत्र सुमारे १ हजार ३८० हेक्टर असून, त्यापैकी लागवड योग्य क्षेत्र ९१७ हेक्टर आहे. गावालगत सुमारे ४१ हेक्टर गायरान व ४०९ हेक्टर वनक्षेत्र आहे. पाझर तलाव सुमारे चार हेक्टर क्षेत्रात आहे. कापूस, मका, गहू, या पिकांबरोबरच येथील बहुतेक शेतकरी भाजीपाला लागवडीवर भर देतात. काही प्रमाणात फळबाग लागवडही केली जाते. औरंगाबाद शहरालगत असल्याने आणि जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीही जवळच असल्याने चांगले मार्केट उपलब्ध झाले लाभले आहे. उत्पादनास मोठी मागणी आणि वाहतूक खर्च कमी असल्याने भाजीपाला लागवडीवर शेतकरी भर देतात. त्यामुळे हाती रोज नगदी पैसा येतो.
सुविधा नाममात्रच
शहरालगत असलेल्या या गावात अनेक पायाभूत सोयी सुविधाचा अभाव आहे. निधी कमी तर विकास कसा होणार, असा प्रश्न येथील कारभाऱ्यांनी केला. दलित वस्ती परिसरात गेल्या दोन वर्षांत आठ लाखांचे दोन सिंमेट रस्ते तयार करण्यात आले आहे. हा अपवाद वगळता गावात अंतर्गत रस्ते नाहीत. पावसाळ्यात चिखल तुडवत जावा लागते. ड्रेनेज लाइन नाही. गाव पूर्णतः पाणंदमुक्त झाले नाही. या कारणामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. गावात रेशन दुकान आहे. गाय, म्हशीसह अन्य जनावरांच्या वैद्यकीय उपाचारासाठी पशुपालकांना नायगाव केंद्रावर जावे लागते.
शाळेला गळती
गावात जिल्हा परिषदेची आठवीपर्यंत शाळा आहे. मराठी व उर्दू माध्यमाचे एकूण २१८ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. शिक्षकाची पुरेशी संख्या येथे आहे, पण शाळेची इमारत जुनी झाली आहे. काही खोल्यांचे बांधकाम नव्याने करण्यात आले, पण ते दर्जेदार नाही. परिणामी, काही वर्गखोल्या पावसाळ्यात गळतात, अशी तक्रार आहे. शाळेला संरक्षक भिंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. वीजबिल थकित असल्याने शाळेचा वीजपुरवठ बंद करण्यात आला आहे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खासगी शैक्षणिक संस्थेत बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. काही मुले हर्सूल भागातही शिक्षणासाठी जातात. गावालगत एक कॉलेजही सुरू झाले आहे. खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी संबंधित शाळांनी स्कूलबसची सोय केली आहे.
जमिनीचे भाव गगनाला
सिडको झालर विकास क्षेत्रात या गावाचा समावेश झाल्यानंतर गावाचा झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. आणि त्यामुळेच येथील शेतजमीनीचा भावही वधारला आहे. रस्त्यांलगतच्या जमिनीचे भाव एकरी सुमारे ३० लाखांहून अधिक आहेत. आतील भागात भाव कमी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावालगत पुडलिकनगरादवळ काही ठिकाणी प्लॉटिंगचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असेही त्यांनी सांगितले.
दुग्ध व्यवसायामुळे बदलले चित्र
दुधाला शहरातून चांगली मागणी असल्याने अनेकजण आता शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडेही आकर्षित झाले आहेत. मयूर पार्क, सिडकोसह शहराच्या अन्य भागांत येथील शेतकरी दररोज दूध विक्रीसाठी येतात. काही खासगी डेअरीला दुधाचा पुरवठा करतात. त्यामुळे गावातील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे चित्र आहे. गावाची प्रतिमा झपाट्याने बदलण्यास त्यामुळे मोठी मदत होत आहे. गावातील सुमारे २० टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ शेतमजूर किंवा अन्य रोजगार, व्यवसाय करतात. काही तरुण, महिला वीटभट्ट्यांवरही कामाला जातात. गाव व परिसरात रोजगार उपलब्ध न झाल्यास अनेकजण शहरात पोट भरण्यासाठी जातात, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
आघाडीची सत्ता
पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, ग्रामपंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे काँग्रेसचे वर्चस्व आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकींत या परिसरात भारतीय जनता पक्षाच्या बाजुने येथील नागरिकांनी कौल दिला.
सभागृहाची दुरवस्था
जटवाडा ग्रुप ग्रामपंचायत आहे. पंचायतीत जटवाडासह पुलतांडा, उमरावती तांडा, चिमणपीरवाडी आदी गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत कार्यालय जटवाडा येथे असून, त्याची दुरवस्था झाली आहे. कार्यालय परिसर बऱ्यापैकी स्वच्छ असला, तरी जुनी इमारत असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी आहे. गावात आमदार निधीतून उभारलेल्या सभागृहाची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. खिडक्याच्या काचा फुटल्या असून, सभागृहात अस्वच्छता आहे.
धार्मिक क्षेत्रामुळे गर्दी
औरंगाबाद शहराच्या उत्तर दिशेला असलेले जटवाडा हे जैन धार्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्राच्या दर्शनासाठी देशभरातील जैनबांधव येथे येतात. एवढेच नव्हे तर खुलताबादेतील भद्रा मारुतीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविक याच मार्गाचा वापर करतात. जैन मंदिरात वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी असते. जटवाडा गावपासूनच डोंगरमाळ सुरू होते. त्यामुळे याठिकाणी निसर्ग पर्यटनास मोठा वाव आहे.
गावाचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यामानाने निधी कमी पडतो. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यास विकासाच्या, रोजगाराच्या अनेक नवीन संधी प्राप्त होतील.
- शेख जब्बार शेख यासीन, उपसरपंच, जटवाडा
ड्रेनेज लाइन नसल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. गावात रस्ते, ड्रेनेज, पथदिवे आदी विकास कामे झाली पाहिजेत.
- लालचंद दिवेकर, ग्रामस्थ जटवाडा
झालर क्षेत्र विकास आराखड्यात गावाचा समावेश होऊन अनेक वर्षे झाली, पण विकास झाला नाही. सिडकोपेक्षा महापालिकेत गावाचा समावेश झाल्यास विकास होईल, असे वाटते.
- महादेव बागडे, ग्रामस्थ, जटवाडा
गावात अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाइन आदी विकासकामे तातडीने करणे आवश्यक आहे. नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा कशा मिळतील, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
- रऊफ पटेल, ग्रामस्थ, जटवाडा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट