स्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षण व मूल्यमापनाच्या कामातील लाचखोरीच्या प्रकरणाने या उपक्रमावरच अभियानावर प्रश्नचिन्ह लागले आहे. चांगले रँकिंग मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा प्रकार समोर आल्याने देशभर खळबळ उडाली आहे. ‘वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी आपली मते प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या युवा कट्ट्यावर परखडपणे मांडली. विकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वच्छता हा घटक महत्त्वाचा आहे. चांगले रँकिंग मिळाले म्हणजे शहर स्वच्छ आहे, असे म्हणणे अयोग्य असल्याचे मत विद्यार्थ्यांनी मांडले. भ्रष्टाचार ही विकृत मानसिकता असून, घडलेला प्रकार देशासाठी लाजिरवाणा आहे. देशातून भ्रष्टाचाराचीच स्वच्छता केली पाहिजे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
लाचेची मागणी निंदनीय
शहराला स्वच्छतेचे चांगले रँकिंग देण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. खरेतर अशा प्रकारचे मूल्यमापन करणे योग्य आहे, असे मला वाटत नाही. हे मानांकन कशाप्रकारे दिले जाते, त्याचे निकष काय आहेत, याची सर्वसामान्यांना माहिती हवी. सर्वसमान्य व्यक्तिलाही स्वच्छतेमध्ये आपलाही काही ‘रोल’ आहे, हे समजायला हवे.
-कमलाकर लांडगे
चांगल्या हेतूला लाचेमुळे हरताळ
शहर स्वच्छ हवे, हे सांगावे लागते. त्यासाठी अभियान राबवाले जाते, हेच लाजिरवाणी गोष्ट आहे. आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, तसे गाव, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पाणंदमुक्त गाव असे अभियानही वर्षानुवर्ष राबविले जात आहेत. त्यावर नियंत्रणासाठी ‘गुड मार्निंग पथक’ नेमण्यात आले. त्याचा किती उपयोग झाला? आता स्वच्छतेच्या अभियानातही भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला. त्यामुळे हेतू कितीही चांगला असला तरी, अर्थ उरत नाही.
- आदेश लेंडाळ
मूल्यांकनावर आता प्रश्नचिन्ह
लाचखोरीच्या प्रकाराने स्वच्छतेबाबत देशभर झालेल्या शहरांच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्याच्या चौकशीनंतर अनेक गोष्टी पुढे येतील. असे असले तरी, अशा घटनांमधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. स्वच्छतेबाबत आपण जागरूक असल्यास लाच मागण्याचा प्रश्नच येत नाही. आपण स्वच्छतेबाबत सक्षम होण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. त्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. ‘स्वच्छते’साठी सोशल मीडियाचाही चांगला उपयोग करता येऊ शकतो.
- अश्विनी करले
आयुक्तांमुळे भ्रष्टाचार उघड
शहर स्वच्छ असणे हे गरजेचे आहेच, परंतु ते केवळ मानांकनावरून शहर स्वच्छ आहे, हे ठरता कामा नये. सर्वसामान्यांचा सहभाग त्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचे निकष दिले जाणारे मानांकन याबाबत अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्यांना माहिती असावी. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकारच घडणार नाहीत. भ्रष्टाचाराला रोखायचे असेल, तर आपणही तेवढेच जागरूक असायला हवे. आयुक्तांनी योग्य भूमिका नसती घेतली, तर हा प्रकारही समोर आला नसता.
- रेखा गुंजाळ
संपूर्ण प्रक्रियेची चौकशी व्हावी
‘स्वच्छ भारत अभियान’ हे देशासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे परिणाम उमटतील. त्यामुळे संपूर्ण प्रकाराची देशपातळीवर परिपूर्ण चौकशी होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाने जागरूक असणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या प्रथा वेळीच रोखता आल्या पाहिजेत. प्रक्रियेतही देशपातळीवर बदल करावे लागतील. स्वच्छता हा विकासात महत्त्वाचा घटक आहे.
- परमेश्वर कालापाड
निकषांची माहिती सर्वांना असावी
शहरांच्या स्वच्छतेवर भर देण्यासाठी अशा प्रकारचे मूल्यमापन करून रँकिंग देण्यास हरकत नाही. ही स्पर्धा पारदर्शक आणि निकोप असावी. अशा प्रकारे लाचखोरीतून हे मानांकने दिले जात असतील, तर ते चुकीचे आहे. स्पर्धेचे निकष सर्वसमान्यांना माहिती असायला हवेत. पारदर्शकतेसाठी अशा उपक्रमांमध्ये सर्वसामान्यांना अधिकाधिक सहभागी करून घेण्यावर भर दिला गेला पाहिजे.
- रजंना माळवे
लाचखोरी लाजिरवाणी
लाचेचा घडलेला प्रकार आपल्यासाठी नव्हेतर देशासाठी लाजिरवाणी घटना आहे. स्वच्छता आरोग्यासाठी महत्त्वाची असते. त्याचे मूल्यमापन भ्रष्टाचारावर होत असेल, तर अरोग्याचे मूल्यमापनही चुकीचेच होईल, याचे भान लोकप्रतिनिधींपासून ते अधिकारी, सर्वसामान्यांनानीही ठेवायला हवे. आपण अनेक वेगवेगळे ‘डे’ साजरे करतो. त्यात न थुंकण्याचा दिवस साजरा करू शकतो का? याचाही विचार व्हावा; तसेच भ्रष्टाचाराच्या विकृत मानसिकतेला रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे.
- दीप्ती गिरी
आयुक्तांचे धाडस कौतुकास्पद
आयुक्तांनी दाखविलेले धाडस खरेच कौतुकाचे आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याचे अधिकाऱ्याने मनावर घेतले, तर किती बदल घडू शकतो हेच यातून समोर आले. या प्रकारातून काही धडे घेण्याचीही गरज आहे. केंद्राने मूल्यांकनात अधिक पारदर्शकता कशी येईल, याचा विचार करवा. त्यामुळे शहरे अधिक स्वच्छ राहतील. त्यातून ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ या संकल्पना प्रत्यक्षात उतरेल. यासाठी प्रशासनासह सर्वसामान्यांनीही प्रयत्न करावेत.
- सुरेखा कोल्हे
आता स्वच्छतेकडे पालिकेने लक्ष द्यावे
औरंगाबादच्या महापालिकेने दाखविलेले धाडस अतिशय अभिमनास्पद आहे. चुकीच्या पद्धतीने मिळालेले मानांकन हे भविष्यासाठी योग्य ठरले नसते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता शहराच्या स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आयुक्त, महापालिका प्रशासनाने अधिक जागरूक राहून शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे.
- प्राजक्ता वाघ
अभियानावरील विश्वास उडेल
अभियान चांगले आहे, परंतु ते गांभीर्याने राबविले जात नाही. स्वच्छतेचे चांगले रँकिंग देतो म्हणून अधिकारी लाच मागत असतील, तर ही कीड मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. तसे झाले नाही, तर अशा अभियानावरचा सर्वसमान्यांचा विश्वास उडेल. स्वच्छतेवर शहराचे सौंदर्य ठरते. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. आम्ही तरुण म्हणून आमच्याही जबाबदारी निश्चित करायला हव्यात.
- कावेरी नवपुते
स्वच्छतेची स्पर्धा पारदर्शक असावी
आपण जे अभियान, धोरणे राबवितो त्याचे काय होते हे या प्रकरणातून समोर आले. पूर्णपणे अभ्यास करूनच असे अभियान राबविणे जाणे गरजेचे आहे. योजनेकडे गांभीर्याने पहायला हवे. नदी जोड प्रकल्पाचे काय झाले, हे आपण पाहिले. एखादे अभियान आपण मिशन म्हणून का पूर्ण करू शकत नाहीत? याचा विचार सर्वांनी करायला हवा. स्वच्छतेचा प्रश्न तर सर्वांच्या आरोग्याशी निगडित आहे.
- करुणा घाईत
भ्रष्टाचाराला प्रोत्साहन
आपल्या देशात भ्रष्टाचाराने आधिच कळस गाठलेला असताना, हा प्रकार समोर आला. अशा मूल्यांकनातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. असे अभियान पारदर्शकपणे राबविण्यासाठी अतिशय कठोर पाऊले उचलली जायला हवीत. पंतप्रधानांनी सुरुवात चांगली केली, परंतु अनेकजण केवळ फोटो पुरते अभियानात सहभागी होत असतील, अभियानाला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागत असेल, तर मूळ हेतूला धक्का पोचतो.
- गौरव जाधव
भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वांनी पुढे यावे
आपण महासत्तेचे स्वप्न पाहत असू, तर ते पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या प्रकारांना रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. जगातील इतर देश स्वच्छतेबाबत किती जागरूक असतात, हे आपण पाहतो. त्यांची शिकवण आपण आत्मसात करायला काय हरकत आहे. जगाशी स्पर्धा करायचे असेल, तर काही गोष्टी आपण बदलायला हव्यात. त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित व्हायला हवी.
- सौरभ राठोड
निकषांतबदल करा
सर्वेक्षण व मूल्यमापनाच्या कामात पारदर्शकता असेल, तर स्पर्धा तेवढ्याच दर्जाची ठरली असती. खऱ्या अर्थाने अभियानाचे ते फलित ठरले असते. स्वच्छतेच्या महत्त्वतेकडे आपण किती दुर्लक्ष करतो, हेच या घटनेतून समोर आले. आरोग्य, विकासासाठी स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शहरांचे मूल्यांकन करून त्यांना मानांकन दिले, तर त्यात अनेकदा गोंधळ उडू शकतो हे लक्षात घेत केंद्रस्तरावरून नवे बदल व्हायला हवेत.
- भाग्यश्री मठदेवरू
विश्वासार्हतेवर लाचखोरीने प्रश्न
या घटनेने एकूणच अभियानाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. आपल्यासह इतर शहरात ही मंडळी गेली. तेथील मूल्यमापन कसे झाले असेल किंवा त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, हे चौकशीअंती समोर येईल. मूल्यमापनाची प्रक्रिया पारदर्शक करण्यावर शासनाने भर द्यायला हवा. जेणकरून यानंतर होणारे मूल्यमापन अधिक चांगल्या पद्धतीने होईल आणि जी शहरे खऱ्या अर्थाने पात्र आहेत, त्यांचा गौरव होईल.
- मयुरी ढोरमारे
लाचखोरीची दखल केंद्र सरकार घेईल
केंद्र पातळीवर अशा घटनांची योग्य ती दखल निश्चित घेतली जाईल, असे मला वाटते. कारण, पंतप्रधानांचे या अभियानाकडे विशेष लक्ष दिसते. स्वच्छतेबाबत प्रत्येक भारतीयाचीही तेवढीच जबाबादारी आहे. स्वतःपासून प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते. स्वच्छतेबाबत कृतीवर भर दिला गेला पाहिजे. आपल्या घरापासून स्वच्छतेचा संदेश देत परिसर स्वच्छतेवर भर दिला गेला पाहिजे. त्यामुळे हे अभियान यशस्वी ठरेल आणि गैरप्रकारांनाही आपोआप आळा बसेल.
- कल्पना डकले
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट