म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेचे व्यवस्थापन पुरते ढेपाळले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. गुणपत्रिका कॉलेजांना पोहचल्या मात्र, गुणपत्रिकांवर प्रात्यक्षिकांचे गुण समावेश करण्याचे विद्यापीठ विसरले. त्यामुळे पुरता गोंधळ उडाला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा, निकालातील गैर कारभाराची मालिका सुरूच आहे. व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेत प्रात्यक्षिकाच्या गुणांचा समावेश करण्याचेच विद्यापीठ विसरल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर-२०१६मध्ये एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. काही कॉलेजांना गुणपत्रिकाही पाठविण्यात आल्या. बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण असल्याचे गुणपत्रिकेवरून समोर आल्यानंतर विचारपूस सुरू झाली. त्यावेळी गुणपत्रिकेत प्रात्यक्षिकाच्या गुणांचा समावेशच करण्यात आला नसल्याचे लक्षात आले. चूक लक्षात येताच, परीक्षा विभागानेही गुणपत्रिका परत मागविल्या. शुक्रवार-शनिवारी असे दोन दिवस हा गोंधळ सुरू होता. आता, या गुणपत्रिका पुन्हा नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सुत्रांनी ‘मटा’ला सांगितले. ही प्रक्रिया केव्हा होणार आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका केव्हा मिळणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.
अशी होते प्रक्रिया..‘तांत्रिक’ अडचणींची ढाल...
‘एमबीए’ अभ्यासक्रमासाठी ८०-२० पॅटर्न आहे. चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) नुसार होणाऱ्या या परीक्षेत ८० गुण थिअरी तर २० गुण प्रॅक्टिकलचे असतात. डिसेंबरमध्ये कॉलेजांनी प्रॅक्टिकलचे गुण विद्यापीठाकडे सादर केले. उत्तरपत्रिका तपासणीनंतर ‘थिअरी’चे गुण आणि प्रात्यक्षिकाचे गुण असे मिळून त्याचे ‘ग्रेड’मध्ये रूपांतर केले जाते आणि गुणपत्रिकेवर ग्रेड दिले जातात. ही सर्व प्रक्रिया गोपनीय व संगणकावर होते. प्रोसेसिंग करताना प्रात्यक्षिकाचे गुण अॅड करण्याचेच विद्यापीठ विसरले. आता, या प्रकरणात तांत्रिक अडचणीचे कारण पुढे केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या या कामात हलगर्जीपणा विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट