क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यासाठी क्रिकेटप्रेमी सनदी अधिकाऱ्यांनीच पुढाकार घ्यावा, संघटना आणि शहरातील क्रीडाप्रेमी त्यांना साथ देतील, असा सूर 'मटा राऊंड टेबल'मधून गुरुवारी उमटला. ‘मटा कॅम्पेन’चा भाग असलेल्या या उपक्रमात शहरातील क्रिकेटशी संबंधित सर्व प्रमुख घटकांची उपस्थिती होती. शासनाने जागा दिली तरी निधी उभारण्यात अडचणी येतील, स्थानिक संघटना असमर्थ असल्यामुळे सर्वकाही करण्यास शासकीय यंत्रणांनीच पुढाकार घ्यावा, अशा सूचना मान्यवरांनी मांडल्या, तर काहींनी आजतागायत स्टेडियम उभारले जाऊ शकले नाही, याबद्दल संतापही व्यक्त केला. स्टेडियम उभारणीसाठी राजाश्रय आवश्यक आहे, तोदेखील संबंधितांनी मिळवावा, असे मत ‘मटा राऊंड टेबल’मधील चर्चेतून व्यक्त झाले. तथापि, पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी समन्वय समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आणि लवकरच त्या दृष्टीने एका बैठकीचे आयोजन करण्याचा शब्द दिला. ‘राऊंड टेबल’मध्ये आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी राम भोगले, सचिन मुळे, शिरीष बोराळकर, जे. यू. मिटकर, साई क्रीडा केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर आणि क्रिकेट संघटक अनिल इरावणे सहभागी झाले. यावेळी झालेल्या चर्चेचा हा आढावा...
सिडकोची जागा मिळणे शक्य
ऐतिहासिक स्थळांचा संपन्न वारसा लाभल्याने औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी आहे. औरंगाबादला आता ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रासारखे एक मोठे सेंटर आपल्याकडे आहे. हळुहळू सुविधा होतील. खेळाडूंना योग्य संधी मिळायलाच हवी. त्यासाठी शॉर्ट टर्म आणि दीर्घकालीन योजना आखण्याची गरज आहे. महापालिकाच्या माध्यमातून गरवारे क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे; तसेच शहरातील विविध मैदानांचा खेळांसाठी वापर करता येऊ शकेल, त्या दृष्टीनेही अॅक्शन प्लॅन आखण्यात आलेला आहे. आमखास मैदानाला ‘फुटबॉल हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. सिडकोतील राजीव गांधी मैदानावर हॉकी मैदान तयार करण्यात येणार आहे. शहरात पालिकेच्या ७० शाळा आहेत. त्यापैकी ५१ शाळांना मैदान आहे, तर १९ शाळांना ही सुविधा नाही. या शाळांजवळील पालिकेच्या मोकळ्या जागांचा खेळासाठी वापर करण्याचा विचार आम्ही करीत आहोत; तसेच पालिका शाळांतील खेळाडूंना बॅटरी टेस्टच्या माध्यमातून साई, बालेवाडीतही पाठवण्याची योजना आहे. शहरात खेळांच्या दृष्टीने आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे गरजेचे बनले आहे. दीर्घकालीन योजनेत स्टेडियम उभारणे आवश्यक आहेच. शहरात ९५८ खुल्या जागा असल्या तरी त्याठिकाणी मोठे स्टेडियम होणे अशक्य आहे. शहराबाहेरच मोठी जागा मिळू शकेल. शहरात बेसिक सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतील. खेळाडूंना सुविधाच मिळणार नसतील तर पदकविजेते घडू शकणार नाहीत. पदकविजेत्यांना कोट्यवधींची बक्षीस मिळतात. ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु खेळाडू घडताना त्याला भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी निधीची गरज आहे.
गुणवान खेळाडूला प्रारंभापासूनच निधी मिळायला हवा. चीनमध्ये एका खेळाडूमागे कोच, फिजिओ असे चार-पाच लोक असतात. त्यामुळे तेथे क्रांतिकारक कामगिरी होते. तसाच प्रयत्न आपल्याकडेही होणे आवश्यक आहे. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. गरवारे क्रीडा संकुलावर रणजी दर्जाचे सामने होऊ शकतील. युवराज, रैनासारख्या खेळाडूंचा खेळ पाहून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. नव्या स्टेडियमसाठी सिडकोकडून ३०-४० एकर जागा मिळू शकेल. स्टेडियमसाठी आपण पुढाकार घ्यायला तयार आहोत. त्याचमुळे समिती स्थापन करण्यासाठी समन्वयकाची भूमिका आपण स्वीकारली आहे. समिती स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या विषयाला योग्य दिशा मिळेल.
- ओम प्रकाश बकोरिया, महापालिका आयुक्त.
‘स्पेशल टीम’ आवश्यक
औरंगाबादेत पूर्वी मिलिंद कॉलेजचे मैदान, गव्हर्नमेंट कॉलेज, आमखास, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, इंजिनिअरिंग कॉलेज, विद्यापीठ अशी मैदाने क्रिकेटसाठी प्रसिद्ध होती. ही प्रचलित मैदाने आता मागे पडली आहेत. सद्यस्थितीत एडीसीए मैदान, एमजीएम क्रीडा संकुल आणि गरवारे क्रीडा संकुल अशी तीन मैदानेच क्रिकेटसाठी आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनाच्या निकषांमध्ये ही मैदाने बसत नाहीत हे खरे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक सुविधा असलेले भव्यदिव्य क्रिकेट स्टेडियम उभारणे आवश्यकच आहे.
जिल्हा क्रिकेट संघटनेची स्वतःच्या मालिकीची जागा असली तरी तेथे स्टेडियम उभारणे शक्य नाही. नवीन स्टेडियमसाठी किमान ३०-४० एकर जागा लागणार आहे. तसेच कोट्यवधींचा निधीही लागेल. या भव्य प्रोजेक्टसाठी एडीसीएकडे आर्थिक बळ नाही. बीसीसीआय, एमसीएकडून किती मदत होईल हे आताच सांगता येत नाही. महापालिकेने पुढाकार घेतला तर एडीसीए त्यांच्या पाठीशी राहिल. मनपाच्या माध्यमातून स्टेडियम उभारणे शक्य होऊ शकेल. ओम प्रकाश बकोरिया, सुनील केंद्रेकर या क्रिकेटप्रेमी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर हे शक्य होऊ शकेल.
स्टेडियमसाठी अनेक आव्हाने आहेत. सर्वप्रथम जागा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. निधी देणाऱ्यांनाही यात महत्त्वाचे स्थान द्यावे लागणार आहे. हा प्रोजेक्ट उभारण्यासाठी स्पेशल टीम तयार करावी लागेल. हे काम संघटनेचे नाही. स्पेशल टीमच हे करू शकेल. प्रशासनातील अधिकारीच यात ‘लीड रोल’ करू शकतील. त्यांना एडीसीएचा ‘बॅकअप’ राहीलच. लोकाभिमुख झाल्याशिवाय हे काम पूर्ण होणार नाही हे तेवढेच खरे आहे. झालर क्षेत्रात जागा मिळू शकते. त्यात क्रिकेट स्टेडियम जागेचा समावेश केला तर २५ ते ४० एकर जागा राखीव ठेवणे शक्य आहे. त्याविषयी तातडीने प्रयत्न करावे लागतील. सद्यस्थितीत जिल्हा क्रिकेट संघटनेचे एडीसीएला कोणतेही निर्णय घेता येत नाहीत, त्यामुळे स्वतंत्र स्टेडियम समितीची स्थापना केली जावी. या कामात जे मदत करतील, त्यांना पदे देण्याचाही विचार केला पाहिजे.
- राम भोगले, अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटना.
‘पीपीपी’तून स्टेडियम शक्य
क्रिकेट स्टेडियम उभारणे ही अवघड गोष्ट निश्चितच नाही. त्यासाठी जागा व निधी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्टेडियम उभारल्यानंतर त्याचा देखभाल खर्च भागवणे हा जिकिरीचा विषय असतो. गुणवान खेळाडू आहेत तर दर्जेदार प्रशिक्षक नाहीत, प्रशिक्षक आहेत तर खेळाडू नाहीत, प्रशिक्षक व खेळाडू आहेत तर सुविधा नाहीत, अशी परिस्थिती आहे. खेळाडू घडवण्यासाठी आधुनिक सुविधा हव्यातच. क्रिकेट स्टेडियम ही औरंगाबादकरांची गरज आहे. ‘पीपीपी’च्या माध्यमातून हे सहज शक्य आहे. त्यासाठी सभासदांची संख्या वाढवावी लागेल. मुंबईतील सीसीआय (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) क्लबच्या धर्तीवर औरंगाबादेत क्लब हाऊसची निर्मिती झाल्यास सहज निधी उपलब्ध होईल. स्टेडियम उभारणीत अनेक खेळांच्या सुविधा निर्माण होतील. साहजिकच इतर खेळांनाही त्याचा फायदा मिळेल. लोढा समितीच्या शिफारशींमुळे आता क्रिकेट क्षेत्रात व्यापक बदल होणारच आहेत. त्यात खेळाडू हाच मुख्य घटक राहाणार आहे. स्टेडियम उभारणीचे काम हाती घेतल्यानंतर अनेक जण पुढे येतील. रणजी, दुलिप सारखे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे सामने झाले तरी मराठवाड्यातील क्रिकेटला मोठी चालना मिळेल.
खेळाडू घडवण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते. यात तडजोड करून चालत नाही. योग्य नियोजन असेल तर खेळाडू निश्चित घडतो. आज अनेक क्रीडा संघटनांमध्ये वादविवाद सुरू आहेत. त्यांचा फटका खेळाडूंना बसत आहे. खेळाडूंच्या दुर्दैवाचा फेरा कधी ना कधी संपवण्याचा विचार व्हायलाच हवा. खेळाडू घडत गेले तरच संघटनेचा नावलौकिक वाढतो. खेळाडू हा फोकस राहिला नाही तर संघटना रसातळाला जाते. याची अनेक उदाहरणे आहेत. नव्या गोष्टीसाठी धाडस हे करायलाच हवे. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. खेळाच्या आधुनिक सुविधा असलेले शहर म्हणून औरंगाबादला ‘मॉडेल सिटी’ बनवण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यात अडचणी येतील, पण त्यावर मात करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे.
- वीरेंद्र भांडारकर, उपसंचालक, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र.
सरकारकडे पाठपुरावा करू
आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पुढाकार घेतल्याने 'गरवारे'चा कायापालट होत आहे. स्थानिक क्रिकेटसाठी हे मैदान योग्य आहे, परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मोठे मैदान आवश्यक आहे. त्यासाठी नवीन जागा घेणेच क्रमप्राप्त आहे. पुण्यात महापालिकेचे नेहरू स्टेडियम आहे. तेथे वाद निर्माण झाल्यानंतर वेगळे स्टेडियम उभे राहिले. हा वाद टाळण्याकरिताच स्वतंत्र स्टेडियम असणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटी, डीएमआयसी असे मोठे औद्योगिक प्रोजेक्ट होत आहेत. या ठिकाणी क्रीडांगणासाठी राखीव जागा आहे. गव्हुंजेतील स्टेडियममुळे त्या परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. रिअल इस्टेटच्या किमतीही वाढल्या आहेत. तसाच फायदा औरंगाबादेतही होऊ शकतो. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित मंडळी स्टेडियम उभारणीस मोलाची मदत निश्चित करू शकतील.
आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी स्टेडियमचे निकष आता खूप बदलले आहेत. राज्य सरकारच्या मदतीने जागा घेण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांपर्यंत जागेचा प्रस्ताव घेऊन जाण्याची आपली तयारी आहे. जागा मिळाल्यानंतर बीसीसीआयकडून निधी उपलब्ध होऊ शकेल. कॉर्पोरेट बॉक्स निर्मितीतूनही मोठा निधी मिळेल. आयुक्त बकोरिया व प्रशासक केंद्रेकर यांनी या प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतला तर स्टेडियम उभारणीला एक योग्य दिशा मिळेल. औरंगाबाद शहराची ओळख आता ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून व्हायलाच हवी. साई क्रीडा केंद्रात इतर खेळांच्या आधुनिक सुविधा होत आहेतच. क्रिकेट स्टेडियमची भर पडली तर जागतिक पातळीवर औरंगाबादचा लौकिक वाढेल. त्यातून उद्योग क्षेत्रालाही चालना मिळू शकेल. मराठवाड्यातील क्रिकेटलाही चालना मिळेल. खेळाडूंमध्ये भरपूर टॅलेंट आहे. त्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी स्टेडियम उभारणी हे पहिले पाऊल ठरेल. त्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. झालर क्षेत्रात आरक्षण टाकले तर क्रिकेट स्टेडियम शक्य आहे.
- शिरीष बोराळकर, सहसचिव, जिल्हा क्रिकेट संघटना.
महापालिका, सिडकोची भूमिका महत्त्वाची
सर्व वादविवाद बाजूला ठेवून क्रिकेट स्टेडियमसाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. सभासदांच्या माध्यमातून ५० टक्के निधी उपलब्ध झाला तर बीसीसीआयकडून ५० टक्के निधी मिळू शकतो. अंदाजे दोनशे-तीनशे कोटींची गरज स्टेडियमसाठी लागणार आहे. बीसीसीआय ही स्वायत्त संस्था असल्याने शासनाकडून निधी मिळू शकणार नाही. इक्बाल सिद्दिकीनंतर महाराष्ट्रातून एकही कसोटीपटू झालेला नाही. केदार जाधवला अलिकडेच वन-डे संघात स्थान मिळाले आहे. स्टेडियममध्ये मोठी भूमिका बजावण्यात मनपाला मर्यादा आहे. सिडकोकडून मोठी मदत निश्चित होऊ शकते. त्यादृष्टीने सुनील केंद्रेकर यांची महत्त्वाची भूमिका ठरू शकेल. प्रत्यक्ष क्रिकेट मैदानासाठी नऊ एकरची जागा लागते. पूर्वी स्टेडियम उभारण्याची चर्चाही झाली होती.
क्रिकेटबरोबरच अन्य खेळांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. क्रिकेटचे प्रशिक्षण तर एडीसीए मैदानावर नियमित सुरूच आहे. १४ व १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये औरंगाबादचा संघ पहिल्या पाच संघांमध्ये स्थान मिळवून आहे. आपल्याकडील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, क्रिकेटबद्दल पॅशन आहे. निधी गोळा करण्यात खूपच अडचणी येतात. लोढा समितीच्या शिफारशींमुळे क्रिकेट क्षेत्रात खूप बदल होत आहेत. एडीसीए मैदानावर क्लब हाऊस करून निधीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकता येईल.
- सचिन मुळे, सचिव, जिल्हा क्रिकेट संघटना.
एडीसीएवर क्लब हाऊस
क्रिकेट स्टेडियम उभारणी आवश्यक असली तरी यात बराच वेळ लागू शकतो. सद्यस्थितीत एडीसीए मैदानावर तातडीने क्लब हाऊस निर्माण होऊ शकते. प्रशिक्षणाच्या आधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देता येतील. खेळाडू, प्रशिक्षकांसाठी थ्री-स्टार दर्जाच्या सुविधाही निर्माण करता येतील. त्यामुळे शहराबाहेरूनही प्रशिक्षक बोलावणे शक्य होईल. सिडकोच्या माध्यमातून कांचनवाडी-नक्षत्रवाडी परिसरात जागा मिळू शकते. स्टेडियमसाठी सिडकोने २५ कोटींची तरतूदही केल्याची माहिती आहे. सुनील केंद्रेकर यांची मोलाची मदत मिळू शकेल. प्रशासनाच्या मदतीने हे काम करताना राजाश्रयही तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. पीपीपीच्या माध्यमातूनही स्टेडियमची उभारणी होऊ शकते. स्टेडियमसाठी निधी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बीसीसीआय व एमसीएच्या माध्यमातून पन्नास टक्के निधी एडीसीएला मिळू शकतो. कार्पोरेट क्षेत्राच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही. त्यासाठी वाद बाजूला सारून सर्वांनीच पुढे आले पाहिजे.
- जे. यू. मिटकर, माजी सचिव, जिल्हा क्रिकेट संघटना.
अभी नहीं तो कभी नहीं...
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याची हीच योग्य वेळ आहे. अब नहीं तो कभी नहीं. ओम प्रकाश बकोरिया, सुनील केंद्रेकर यांच्या क्रिकेटप्रेमामुळे हे सहज शक्य होऊ शकते. साई क्रीडा केंद्रात अन्य खेळांच्या आधुनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. चांगले इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याने खेळाडूला माझ्यासाठी यात काय आहे असा प्रश्न पडतो. शासनाकडून स्टेडियमसाठी जागा निश्चित मिळू शकते. त्यासाठी सर्वांना एकत्रित पाठपुरावा करावा लागणार आहे. खरे तर ९०च्या दशकातच शहरात स्टेडियम व्हायला हवे होते. कसोटी, वन-डे हे सामने इतक्या लवकर होणार नाहीत. परंतु, अन्य मोठे सामने होण्याचा मार्ग तरी मोकळा होईल. त्याचाही फायदा आपल्या क्रिकेटपटूंना होईल. एकेकाळी शरद पवार, विलासराव देशमुख हे क्रिकेटचे बॉस होते. त्यांच्या काळात आपण ही संधी गमावली आहे. आता तरी टीमवर्क दाखवून क्रिकेटपटूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढे आले पाहिजे.
औरंगाबाद ही पर्यटननगरी आहे. स्टेडियम झाल्यास पर्यटनाबरोबरच औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फायदा निश्चित होणार आहे. अनेक कंपन्या पुढे येतील. शहरात वेळ घालवण्याकरिता चांगल्या जागाच नसल्याने आपल्याकडील उद्योजक, त्यांचे अधिकारी अन्य शहरात जातात. तिथे विकेंड साजरा करतात. स्टेडियम उभारणीसाठी निधी देणारी मंडळी आपल्याकडे आहेत. खेळाडूंच्या टॅलेंटला सुविधांची जोड दिली, तर क्रीडा विश्वाचा चेहरा-मोहराच बदलून जाईल.
- अनिल इरावणे, क्रिकेट संघटक.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट