म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
२६ लाखांच्या थकित वीज बिल वसुलीसाठी भूमी अभिलेख प्रशिक्षण शाळेची वीजसेवा महावितरणे खंडित केली आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात अचानक मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची बदली झाल्याचा आदेश आल्यानंतर मागील तीन दिवसांपासून ही वीजबिल वसुली थंड बस्त्यात पडली होती. मात्र, मंगळवारी गणेशकर रुजू झाल्यानंतर महावसुलीच्या कारवाईला पुन्हा सुरुवात करण्यात आली. औरंगाबाद शहर एक विभागांतर्गत अनेक शासकीय कार्यालय आहेत. दमडी महालच्या बाजूला असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाला डिसेंबर २०१६ पासून १० फेब्रुवारी २०१७ दरम्यान एकूण २३ लाख ७७ हजारांच्या वीज बिल वसुलीची नोटीस महावितरणने फेब्रुवारी महिन्यात दिली होती. संबंधित विभागाकडून या पैशाचा भरणा करण्यात आला नाही. वारंवार या कार्यालयाशी वीज बिल भरण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
आतापर्यंतची कारवाई
औरंगाबाद व जालना जिल्हयात आतापर्यंत २९४५ वीज ग्राहकांकडून एक कोटी ५९ लाख ३४ हजार रुपये वसूल करण्यात आले. सूचना, विनंत्या, नोटिसा बजावूनही दाद न देणाऱ्या १६५ वीज ग्राहकांचा ४१ लाख २९ हजार रुपये थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करून मीटर व वायरी जप्त केल्या. १८ थकबाकीदारांचा दोन लाख एक हजार रुपयांच्या वीज बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट