जमिनीवर बसून परीक्षा, कॉप्यांचा महापूर असे प्रकार लाडसावंगीतील परीक्षा केंद्रावर आढळून आल्यानंतर मंडळाला जाग आली आहे. परीक्षा केंद्रप्रमुख बदलण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. मंगळवारी मराठीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात कॉप्या करण्याचे प्रकार समोर आले. औरंगाबादजवळ असलेल्या लाडसावंगीतील जिल्हा परिषद हायस्कूल परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून परीक्षा दिली. तेथे अनेक पर्यवेक्षकच कॉपी देत असल्याचे समोर आले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या केंद्रावरील कॉप्यांचा महापूर आणि भौतिक सुविधांची वानवा मांडली. त्यामुळे दिवसभर मंडळात लाडसावंगी परीक्षा केंद्राचीच चर्चा होती. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मंडळाने केंद्रप्रमुख तातडीने बदलले. या प्रकरणात कोण-कोण दोषी आहे, प्रत्यक्ष कॉपी पुरविण्यात पर्यवेक्षकांचा सहभाग आहे का, सोयी-सुविधांची काय स्थिती आहे, यासंदर्भात चौकशी समिती नेमल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्राची तपासणी करून अहवाल मंडळाला सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे या केंद्राला भरारी पथकाने भेट दिली, पण त्यावेळी पथकाला जमिनीवर बसून परीक्षा देणारे विद्यार्थी दिसले कसे नाहीत, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
तीर्थपुरी केंद्रावरही जमिनीवर बसून परीक्षा
कोणत्याही विद्यार्थ्याला जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बेंचची व्यवस्था करण्याच्या सूचना मंडळाने दिलेल्या आहेत. तरीही अनेक विद्यार्थ्यांवर जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ आली आहे. लाडसावंगीप्रमाणे तीर्थपुरी येथील परीक्षा केंद्रावरही काही विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून परीक्षा दिल्याचे मंडळ अध्यक्ष शिशीर घोनमोडे यांनी ‘मटा’ला सांगितले. या दोन्ही केंद्रांवर आवश्यक ते बाकडे उपलब्ध करून दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॉपींचे प्रकार थांबेनात
पेपरफुटीमुळे बारावीची परीक्षा राज्यभर गाजते आहे. बारावी परीक्षेत आजच्या पेपरमध्ये एकूण १६ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यात १२ परीक्षार्थी एकाच केंद्रावरील आहेत. शिक्षणाधिकारी यांचे भाऊ अध्यक्ष असलेल्या जयहिंद पब्लिक हायस्कूल या परीक्षा केंद्रावर हा प्रकार समोर आला. शिक्षण मंडळाचे भरारी, महसूलचे बैठे पथक, केंद्राबाहेर ‘सीसीटीव्ही’ अशा अनेक उपायानंतरही दहावी, बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान कुचकामी ठरले आहे. बुधवारी बारावीचा रसायशास्त्राचा पेपर होता. या विषयात १६ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणात कारवाई करण्यात आल्याचे विभागीय सचिव वंदना वाहुळ यांनी सांगितले. त्यात शहरालगत असलेल्या जयहिंद पब्लिक हायस्कूल या एकाच केंद्रावर १२ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली. औरंगाबाद तालुक्यात २, तर बीड जिल्ह्यात २ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. जयहिंद पब्लिक हायस्कूलच्या व्यवस्थापन मंडळावर प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांचे भाऊ, पत्नी असल्याचे सूत्रांनी सांगितले. निरंतर शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या परीक्षा केंद्रावर भरारी पथक परीक्षा सुरू झाल्यापासून गेले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
शाळा शिक्षणाधिकाऱ्यांशी संबंधित असो, की कोणाचीही, गैरप्रकार होत असेल, तर कारवाई होणारच. कोणाचीही गय केली जाणार नाही. जयहिंद पब्लिक हायस्कूल परीक्षा केंद्राचा अहवाल मी मागविला आहे. त्याचबरोबर खाली बसून परीक्षा देण्याची वेळ येऊ नये म्हणून बेंच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- शिशीर घोनमोडेे, विभागीय अध्यक्ष, शिक्षण मंडळ.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट