म. टा. प्रतिनिधी, जालना
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील २५ गावांमधून जात असून बदनापूर तालुक्यातील दहा गावे व जालना तालुक्यातील १५ गावांमधून जवळपास १२०० शेतकऱ्यांची पाचशे हेक्टर जमीन महामार्गामध्ये संपादीत होत आहे. या मार्गाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या संपादीत करण्यात येणाऱ्या जमिनी तसेच संघर्ष समिती व शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपासंदर्भात बदनापूर तालुक्यातील अकोला (निवळक) व जालना तालुक्यातील (कडवंची) या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन महामार्गात बाधित होणाऱ्या शेत जमिनीतील फळबाग व इतर पिकांची पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व पशुसंर्वन व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी कडवंची येथील शेतकऱ्यांच्या शेतावर मंत्र्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांप्रती अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे. तसेच बाधित झालेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात येणार असून या करीता राज्य शासनाची शेतकऱ्यां प्रती सकारात्मक भूमिका असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जालन्यात नमुद केले. यावेळी आमदार शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए. बी. गायकवाड, राज्य महामार्गाचे अप्पर जिल्हाधिकारी (प्रशासन) जगदिश मणियार, कार्यकारी अभियंता उदय भरडे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके उपस्थित होते.
मंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पुढे म्हणाले, ‘नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा मोठा प्रकल्प असून नागपूरहून मुंबईला बसने जाण्यासाठी १५ ते १६ तास लागतात. ते महामार्ग झाल्यामुळे नागपूर ते मुंबईला जाण्यासाठी सहा ते सात तास लागतील. रस्ता व दळणवळण ही देशाची रक्त वाहीणी आहे. त्यामुळे हा महामार्ग देशाच्या विकासात निश्चितच मोलाची भूमिका बजावणार असून शेती संबंधित उद्योग व विविध व्यवसायाला यामुळे चालना मिळणार आहे. समृध्दी महामार्ग सर्व सामान्य तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून महामार्ग पुढे जाईल व जास्तीत- जास्त लाभ या महामार्गामुळे घडून येतील.’
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील २५ गावांमधून जात असून बदनापूर तालुक्यातील दहा गावे व जालना तालुक्यातील १५ गावांमधून जवळपास १२०० शेतकऱ्यांची पाचशे हेक्टर जमीन महामार्गामध्ये संपादीत होत आहे. शेतकऱ्यांना संपादीत जमिनीचा मोबदला देण्यासाठी जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी जालना येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात बोलविण्यात आले होते. यावेळी भगवान साळुबा येवले, बाबासाहेब साळुबा येवले, उमाजी साळुबा येवले या शेतकऱ्यांनी त्यांचे जमीचे खरेदीखत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास करून दिले. यावेळी राज्याचे पशुसंर्वन, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत जमीनीच्या खरेदी खताची कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तातरीत केली.
रेडीरेकनरच्या दरापेक्षा जादा मावेजाचा दर - खोतकर
पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातून नागपूर –मुंबई समृद्धी महामार्गातंर्गत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाधित जमिनीला रेडीरेकनरच्या दरापेक्षा जास्तीत जास्त मावेजा दर देण्यात येणार असून या भागातील महामार्गामध्ये नष्ट होणारे स्ट्रक्चर (बांधकामे) गोठे, घरे, शेततळे, विहीरी, फळझाडे, बगीचे यांचे मुल्यांकन करून जास्तीत जास्त महामार्गात बाधित झालेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे. द्राक्षाच्या एका (वेल) झाडासाठी मोबदला म्हणून दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचेही त्यांनी नमुद केले. यासाठी शेतकरी हा केंद्र बिंदू मानून नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग पुढे जाईल. यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे मंत्री खोतकर यांनी नमूद करून या भागातील झीज भरून काढण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
##############################