पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्या झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे गुरुवारी रात्री ११च्या सुमारास नाथसागरातून दहा हजार क्युसेक पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. प्रकल्पाचे आठ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाथसागरात सुमारे १२ टक्के पाणी शिल्लक होते. जून महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात मोठा पाऊस झाला. त्यामुळे नाथसागरात पाणी येण्यास सुरुवात झाली होती. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडला. त्यानंतर १५ ऑगस्टनंतर जायकवाडीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नगर व नाशिक जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. काल (बुधवारी) रात्री धरणातील साठा ८९ टक्क्यांपर्यंत पोचला होता. गुरुवारी नगर, नाशिक जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे ऊर्ध्व भागातील धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले, मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील मुक्त पाणलोटात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत वेगाने वाढ झाली.
गुरुवारी सायंकाळी सहापासून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले. सहा वाजता प्रकल्पात ७९ हजार क्युसेक पाणी येत होते. ते रात्री आठ पर्यंत एक लाख पाच हजार क्युसेक आणि रात्री नऊ वाजता एक लाख १७ हजार क्युसेकपर्यंत पोचले. रात्री आठ वाजता धरणात उपयुक्त साठा ९५.३२ टक्के होता. तो दहापर्यंत ९६.२० टक्क्यांपर्यंत पोचला.
येणाऱ्या पाण्याचे प्रमाण विचारात घेऊन शुक्रवारी सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र जास्त पाणी येत असल्याने गुरुवारी रात्री ११च्या सुमारास पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘कडा’च्या सूत्रांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट