वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवा
वन्यजींव अभ्यासक यार्दी यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केवळ पोस्टरवर जनजागृती करून उपयोग नाही तर प्रत्यक्ष कृती करत वन्यजीव संरक्षणासाठी प्रभावी जनजागृती झाली पाहिजे. हवा, प्रदूषण व मानवी अतिक्रमणांनी वन्यजीवांचा अधिवास संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे तो कसा अबाधित राहील यासाठी, अधिक प्रभावी प्रयत्नाची गरज आहे, असे मत वन्यजींव अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी यांनी व्यक्त केले.
वन्यजींवाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, यासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी १ ते ७ ऑक्टोबर या कालवधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जाते. यानिमित्त ते मटाशी बोलत होते.
मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. गंभीर जखमी होत असल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळेच वन्यजीवांचा अधिवास कसा संरक्षित राहील, तेथील अन्नसाखळी कशी कायम राहील, मानवी हस्तक्षेप कसा टाळता येईल, यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत, असे यार्दी यांनी सांगितले. प्रदूषण व मानवी अतिक्रमणांनी वन्यजीवांचा अधिवास संपुष्टात येण्याची भीती निर्माण होत आहे. याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. केवळ पोस्टर लाऊन जनजागृती शक्य नाही तर त्याचबरोबर अधिक प्रभावीपणे प्रत्यक्ष जनजागृती कशी होईल, यासाठी प्रयत्न व्हावेत. वन्यजीवांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. शिक्षण व जनजागृती हाच वन्यजीव अधिवास टिकवण्याचा खरा उपाय आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट