म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देखभाल दुरूस्तीसाठी घेण्यात आलेला ३६ तासांचा मेगा शटडाउन शनिवारी सायंकाळी संपला. मात्र, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सकाळपासून विविध भागात पाणीपुरवठा सुरू होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे. शटडाउनच्या काळात सुमारे पंधरा ते वीस ठिकाणी दुरूस्तीची कामे करण्यात आली.
दिवाळी सणात शहरात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे शुक्रवारी सकाळी अकरापासून शटडाउन घेण्यात आले. ३६ तासांचे शटडाउन असेल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी रात्री अकरा वाजेपर्यंत कामे पूर्ण होतील, असे मानले जात होते. मात्र, सायंकाळी सात वाजता देखभाल दुरूस्तीची कामे पूर्ण झाली. ही माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी दिली. कामे पूर्ण झाल्यावर जायकवाडीच्या पंपहाऊसमधून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. रात्रीतून शहरातील बहुतेक जलकुंभ भरतील आणि सकाळी पाणीपुरवठा सुरू होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला.
या काळात फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर दुरूस्त करण्यात आले. याच ठिकाणचा ८०० मिलिमीटरचा पाइप बदलण्यात आला. जलशुद्धीकर केंद्राच्या पंपिंग स्टेशनमधील पाइपांची गळती दुरूस्त करण्यात आली. जायकवाडी येथील पंपहाऊसमध्ये असलेला सहावा पंप दुरूस्त करण्यात आला. स्टेशनसमोरील मुख्य रस्त्याच्या मधोमध एअर व्हॉल्व्ह बाजूला स्थलांतरीत करण्यात आला. टकसाळी मंगल कार्यालयाच्या शेजारी जलवाहिनीवर गळती होती, ती दुरूस्त करण्यात आली. ढोरकीन येथील पंपहाऊसचा भूमिगत हौद स्वच्छ करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट