म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय तरुणांमध्ये नेतृत्त्वाची क्षमता आहे. राजकारणात निवृत्तीचे वय असायला हवे, तर अनुभव, कार्यक्षमता, इच्छाशक्ती असल्यास राजकारणात वयाला बंधन नसते, अशा दोन्ही बाजू उत्तमपणे मांडत तरुणाईने ‘स्पीक फॉर इंडिया’ व्यासपीठावर वक्तृत्वाची छाप उमटविली. ‘फेडरेशन बँक’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या कार्यक्रमाची जिल्हास्तरीय फेरी मंगळवारी झाली.
देवगिरी इंजिनीअरिंगच्या सभागृहात ही स्पर्धा रंगली. जिल्ह्यातील विविध कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदिवला. विद्यार्थ्यांमधील वक्तृत्त्वगुणला वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडली. पहिल्या टप्प्यात स्पर्धकांना विषयाची चिठ्ठी उचलायची होती. त्यावर दहा मिनिटे विचार करून विषय एका मिनिटात मांडायचा होता. अतिशय उत्तमरित्या आपला विषय मांडत तरुणाई अवांतर वाचनात कोठे कमी नसल्याचे दाखवून दिले. पहिल्या फेरीत ‘वेळेचे नियोजन’, ‘बीटकॉन’, ‘मेक इन इंडिया’, ‘रिअॅलिटी शो’, ‘सेल्फी कल्चर’, ‘खेळामधील पैसा’ असे विषय होते. यात ४२ स्पर्धकांनी आपली मते मांडली. त्यातून पुढील फेरीसाठी २० जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर या २० स्पर्धकांची पाच गटांत विभागणी करण्यात आली. टीममधील सदस्यांचे दिलेल्या विषयाच्या बाजुने आणि विरुद्ध असे दोन संघ करण्यात आले. ‘अवयवदान सक्तीचे हवे का’ विषयावर विद्यार्थ्यांनी सांगितले समाजाचे आपण देण लागतो या भावनेतून प्रत्येकाने अवयव दान करणे गरजेचे आहे. कोणाला तरी, आपण जीवनदान देतो. अवयवदान अधिकार असला तरी, अधिकारापेक्षा याकडे कर्तव्य म्हणून पहिले जावे, असे बाजू मांडतान सांगण्यात आले. देशातील आरोग्य व्यवस्थेत बोकाळलेला भ्रष्टाचार, सोयीसुविधांचा अभाव लक्षात घेता अशाबाबींवर घाईकरणे योग्य नसल्याचे स्पर्धकांनी मांडले. ‘आपली भावना व्यक्त करायला स्वातंत्र्य आहे का’ विषयावर आज विविध पातळीवर घातले जाणारे निर्बंध, दडपण, दबाव अशाबाबींमुळे स्वातंत्र्य म्हणता येईल का? असा प्रश्न करत आपल्या शैलित दोन्ही बाजू विद्यार्थ्यांनी मांडली. नेतृत्व करण्याचे वय असते त्याच काळात तरुणांकडे नेतृत्व देण्याची गरज आहे. नवीन कल्पना समोर येतील अन् देशाचा विकास होईल असे ‘राजकारण्यांच्या वयाच्याबाबतीत कायदा करावा का’ विषयावर स्पर्धकांनी मत मांडले. निर्णय क्षमता, इच्छाशक्ती, कार्यक्षमता असेल तर वयाचे बंधन कशाला, वयाचे बंधन घातल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती गळचेपी ठरेल, असे मतही व्यक्त करण्यात आले.
‘सोशल मीडियामुळे असहिष्णुतेला बळ मिळते का’ विषयावर मत मांडताना विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचे फायदे-तोटे सांगितले. नवीन तंत्रज्ञान हे आपल्याला जगाशी जोडते. त्याचा कसा वापर करू हे प्रत्येकावर असल्याचे मत मांडण्यात आले.
‘काळा पैसा अर्थव्यवस्थेला चांगला का’ विषयावर काळा पैसा हा अर्थव्यवस्थेला लागलेली कीड आहे. त्यामुळे देशाच्या विकासावर परिणाम होतो, असे परखड मत स्पर्धक विद्यार्थ्यांनी मांडले. विषयांची मांडणी, मुद्दे अन् उत्तम संवादाच्या माध्यमातून तरुणाईने उपस्थितांची दाद मिळविली. परीक्षक म्हणून प्रितम तांदुळजे, ए. आर. नलावडे, विशाखा नायनार यांनी काम पाहिले.
हे सहा शिलेदार पोहचले विभागीय पातळीवर
अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातून सहा विद्यार्थी विभागीय पातळीवर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वर चौथमल, भरत रिडलॉन, अंकित म्हस्के, दिग्विजयसिंग राऊत, अदिनाथ प्रयाग, वैष्णवी भावठाणकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट