स्वच्छ सर्वेक्षणा योजनेच्या अॅपमुळे महाराष्ट्र आणि बिहार जोडले गेले आहेत. बिहारमधील औरंगाबादच्या स्वच्छतेसंबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पालिकेचे स्थानिक प्रशासन स्तंभित झाले. प्राप्त झालेल्या तक्रारी आता बिहारला पाठवण्याचे नियोजन केले जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने यंदा चार हजार ४४ शहरांचा समावेश केला आहे. या शहरांमध्ये स्वच्छतेसंदर्भात स्पर्धा होणार आहे. यापूर्वी ५०० शहरांमध्ये स्वच्छतेबद्दल स्पर्धा झाली होती. त्यात औरंगाबाद महापालिकेचा क्रमांक २९९ वा आला होता. आता चार हजार ४४ शहरांमध्ये स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेत रँकिंग वाढवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामासाठी केंद्र सरकारने स्वच्छता अॅप तयार केले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासनाने या अॅपचा उपयोग कालपासून (बुधवार) सुरू केला आहे. या अॅपच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ४० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. या ४०पैकी नऊ तक्रारी बिहारमधील औरंगाबाद शहराशी संबंधित आहेत. उर्वरित तक्रारींपैकी आठ तक्रारी लगेच निकाली काढण्यात आल्या, असे भालसिंग यांनी सांगितले.
अॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तीन दिवसांचा अवधी शासनाने नेमून दिला आहे. त्यानुसार या तक्रारी निकाली काढण्यात येथील असे त्यांनी स्पष्ट केले.
...तर महापालिकेला १५० गुण मिळतील
केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत तयार केलेले अॅप शहरातील दोन टक्के नागरिकांनी आपल्या फोनमध्ये डाउनलोड केल्यास स्पर्धेत औरंगाबाद महापालिकेला ९००पैकी १५० गुण मिळणार आहेत. औरंगाबाद शहराची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. म्हणजे किमान तीस हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे. अॅन्ड्राइड फोनच्या प्ले-स्टोअरमध्ये जाऊन स्वच्छता अॅप डाउनलोड करता येते. अॅप डाउनलोड केल्यावर नागरिकांना त्यांच्या परिसरातील स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी फोटोसह संबंधित महापालिकेकडे पाठवायच्या आहेत. महापालिकेने प्राप्त झालेल्या तक्रारी तीन दिवसांत निकाली काढणे गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी औरंगाबाद महापालिकेने स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेतली. प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा कसा करायचा, याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट