म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय पातळीवर अभियांत्रिकी, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा रविवारी (आठ एप्रिल) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आली. औरंगाबाद केंद्राहून १५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. रसायनशास्त्रात 'ऑरगॅनिक', भौतिकशास्त्रात 'मॉर्डन'वर आधारित प्रश्न अधिक होते, असे विद्यार्थ्यांनी 'मटा'ला सांगितले.
आयआयटी, एनआयटीसंस्थामध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा शहरातील ३२ केंद्रावर घेण्यात आली. १५ हजार १२० विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. सकाळी सातपासून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात उपस्थित राहत होते. विद्यार्थ्यांसह पालकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूचनांचा भडिमार आणि वेळेचे नियोजन करता करता विद्यार्थी, पालकांची तारांबळ उडाली. काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी उशिराने आल्याने त्यांना प्रवेश दिला गेला नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या चार-पाच होती. पहिल्या सत्रातील पेपर सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा यादरम्यान, तर दुसऱ्या सत्रातील पेपर दुपारी दोन ते पाच या वेळेत झाला. पहिला पेपर अभियांत्रिकी, तर दुसरा पेपर आर्किटेक्ट अभ्यासक्रमासाठी होता. लेखी (पेन व पेपर बेस्ड) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विविध सूचना प्रवेशपत्रावर देण्यात आल्या होत्या. त्यानुसार परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले.
\B१५, १६ रोजी 'ऑनलाइन'
\Bलेखी परीक्षेनंतर १५ व १६ एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या मुख्य परीक्षेतून दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतात. या परीक्षेची उत्तरसूची २४ ते २७ एप्रिलदरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्य परीक्षेचा निकाल ३० व ३१ मे रोजी जाहीर होईल. मराठवाड्यात यंदा लेखीसह ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे.
\Bमराठवाड्यातील परीक्षा केंद्र वाढली\B
जेईई मेन् परीक्षा रविवारी होत आहे. लेखी परीक्षा देशभरातील ११२ शहरांतून परीक्षा झाली. ऑनलाइन परीक्षा १५ व १६ एप्रिल होणार आहे. ही परीक्षा देशभरातील २५८ शहरांमधून होणार आहे. लेखी परीक्षेसाठी औरंगाबाद परीक्षा केंद्र आहे, तर ऑनलाइन परीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबादसह परभणी, नांदेड, लातूर आणि बीड ही केंद्रे आहेत.
प्रश्नपत्रिका तशी अवघड होती. पेपर चांगला सोडविता आला, वेळ पुरला. केमिस्ट्रीत 'ऑरगॅनिक केमिस्ट्री', फिजिक्समध्ये 'मॉर्डन'वर आधारित प्रश्नांची संख्या अधिक होती.
- मानस पुरंदरे, परीक्षार्थी
जेईईमध्ये प्रश्नपत्रिकेत तार्किकवर आधारित प्रश्नांचा भरणा होता. प्रश्नपत्रिकेत काही ठराविक प्रश्नांची संख्या जास्तीची होती जसे की, गणिताच्या प्रश्नपत्रिकेत भूमितीशी संबधित प्रश्न अधिक होते. त्यामुळे भारमान (वेटेज) एका भागाला अधिक आहे, असे वाटले.
- देवश्री रॉय, परीक्षार्थी
प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी उच्च नव्हती. सर्वसाधारण प्रश्नांना वेटेज होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला असेल, असे वाटत नाही. त्यामुळे निकाल चांगला असेल.
- प्रा. धनंजय काळे, रसायनशास्त्र विषयतज्ज्ञ