म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद विविध घोषणा, धर्मवंदना, धर्मगुरूंचे आर्शीवचन, लिंगायत धर्मातील विविध पदे यामुळे विभागीय आयुक्तालयाचा परिसर रविवारी दुपारी तीननंतर दुमदुमला. लिंगायत समाज समन्वय समितीचे राष्ट्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर, जिल्हा समन्वयक प्रदीप बुरांडे यांनी भाषणातून मोर्चाचा उद्देश आणि मागण्या सविस्तर मांडल्या. या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिल्लीत धडक मारू, त्यासाठी समाजाने तयार राहावे, असे त्यांनी आवाहन केले. दिल्ली गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रुपांत झाले. या सभेत डॉ. माते महादेवी (प्रथम महिला जगदगुरू) यांनी आशीर्वचन दिले. यावेळी बसवपीठावर वीरेंद्र मंगलगे, वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वर खर्डे, दीपक उरगुंडे, प्रदीप बेंजरगे, गुरुपादअप्पा पडशेट्टी, सचिन खैरे, विश्वनाथ स्वामी, आत्माराम पाटील, सचिन संघशेट्टी, शिल्पाराणी वाडकर, गणेश वैद्य, जयश्री शृंगारे यांची उपस्थिती होती. दरम्यान मोर्चात उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे, भाजपचे आमदार अतुल सावे, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ, काँग्रेसचे आमदार सुभाष झाबंड, शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल, भाजपचे माजी महापौर बापू घडमोडे, भाजप नेते डॉ. भागवत कराड यांनी पाठिंबा दिला होता. मुख्य मागण्या दोनच लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी, लिंगायत धर्मियांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक वर्गामध्ये समाविष्ट करावे अशा दोन मागण्यांचे निवदेन देण्यात आले. हे निवेदन विभागीय उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा ठाकूर यांनी स्वीकारले. यावेळी २५ जणांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यात प्रदीप बुरांडे, वीरभद्र गादगे, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, शिल्पाराणी वाडकर, डॉ. प्रदीप बेंजरगे, दीपक उरगुंडे, राजेश कोठाळे, ज्ञानेश्वर खर्डे, गुरूपादअप्पा पडशेट्टी, गणेश वैद्य, अभिजित घेवारे, अविनाश भोसीकर, अशोक मस्तापुरे, माधवराव पाटील टकळीकर, सुधीर सिंहासने, राजेश विभुते, अशोक मेनकुदळे, वीरेंद्र मंगलगे, सुनील हिंगणे, आनंद कर्णे, रोहित बनवसकर यांचा समावेश होता. समाजाकडूनच अर्थसाह्य राज्यात काढण्यात आलेला हा सहावा मोर्चा ठरला. समाजातील दानशूर, व्यापारी, उद्योजक, स्थानिक समन्वय समितीकडून आर्थिक भार उचलण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. रविवारी आयआयटी, जेईई मेन्स व इतर स्पर्धा परीक्षांचा दिवस असूनही विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण झाली नाही. लिंगायत धर्मियांवर अन्याय- परमपूज्य डॉ. माते महादेवी लिंगायत धर्माला स्वतंत्र, स्वाभिमानी, मानवतावादी इतिहास आहे. मात्र त्याची माहिती लिंगायत बांधवांना नसल्यामुळे समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात मागे राहिला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लिंगायत धर्माला शासनमान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळालाच पाहिजे, अशी मागणी परमपूज्य डॉ. माते महादेवी बेगळुरु यांनी केली. बौद्ध, जैन, ख्रिश्चन, इस्लाम, शीख या धर्मांना शासकीय मान्यता व अल्पसंख्याक असल्याने सर्व वैधानिक सवलती मिळतात. परंतु १९५१मध्ये लिंगायत धर्माची शासकीय मान्यता रद्द केल्यामुळे सवलती व हक्क मिळत नाहीत. हेच लिंगायत धर्मियांच्या सर्व समस्यांचे मूळ आहे, असे त्यांनी सांगितले. मोर्चाचे वैशिष्ट्य सर्वधर्म गुरु रथात बसले होते. समाजातील सर्व बांधवा पारंपरिक वेशभूषा, हातात झेंडा घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. हजारोंचा जनसागर हातात भगवा ध्वज हाती घेऊन रस्त्यावर उसळल्यामुळे संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले. म्हणजे एवढा भव्य मोर्चा असूनही अत्यंत शिस्तबद्ध व शांत पद्धतीने मोर्चेकरी सहभागी झाले होते. जागोजागी मोर्चेकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक उभे होते. _______________________________________________________________________ प्रतिक्रिया आणि क्षणचित्रे मोर्चातील घोषणा महात्मा बसवेश्वर महाराजांचा विजय असो गर्व से कहो हम लिंगायत है भारत देशा एकच बसवेशा मी लिंगायत, धर्म माझा लिंगायत एक लिंगायत कोटी लिंगायत .... बसव ग्रुपकडून स्वच्छता लिंगायत मोर्चामध्ये सामील मोर्चेकरूंसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती. रिकामे पाणी पाऊच व प्लास्टिक बाटल्या रस्त्यावरून उचलण्यासाठी बसव ग्रुप काम करत होता. यात शैलेंद्र पुटे, रवीकुमार पळसकर, केशर पातारकर, गजानन हिरवे यांच्यासह अन्य लिंगायत स्वंयसेवकांनी सहभाग नोंदविला. ………... क्षणचित्रे - प्रत्येकाला एक टोपी, एक झेंडा अनिवार्य - दोन जणांची रांग लावून निघाला मोर्चा - धर्मगुरूंचा भव्य रथातून बसून सहभाग - क्रांती चौकातील काला चबुतऱ्याशेजारील मैदानात चारचाकींचा व्यवस्था - अनेक दुचाकी वाहनांची पार्किंग क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली - मुलांपासून वृद्धांचा मोर्चात सहभाग - मोर्चेकरूंना पुरीभाजीचे पाकिटातून वाटप …………………- मोर्चात सहभागी तरुणांनी काढून घेतले 'टॅटू' - मराठा सेवा संघचे विश्वभंर गावंडे, डॉ. आर. एस. पवार, दीपक पवार, धनंजय पाटील यांच्याकडून मागण्यांना पाठिंबा .... लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा, स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी. यासाठी सेलू येथून आम्ही सर्व मित्र आलो आहोत. समाजाच्या विकासासाठी हा निर्णय आवश्यक आहे. -मनोज शेट्टे … लिंगायत समाजाला धर्ममान्यता आवश्यक आहे. १९४७ पर्यंत लिंगायत धर्माला मान्यता होती. मग आता का नाही? यामुळे लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता देण्याची गरज आहे. -रोहित धारकर … धार्मिक आरक्षण नसलयाने लिंगायत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सवलत शिक्षणात मिळत नाही. यासाठी आम्हालाही इतर धर्माप्रमाणे धर्म स्वतंत्र करून अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा द्यावा. -मन्या वैद्य … स्वतंत्र धर्म हीच लिंगायत समाजाची मागणी आहे. त्यासाठी आम्ही आलो आहे. 'मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत' हीच पहिली आणि शेवटची मागणी आहे. -गणेश सोनवळे … लिंगायत धर्माला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी. या धर्मातील व्यक्तीला न्याय मिळावा. यासाठी धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात आम्ही सहभागी होत आहे. -हरीश सोनवळे … लिंगायत धर्माला मान्यता मिळावी. यासाठी हे आंदोलन सुरू आहे. हे मोर्च राज्यातील विविध शहरांमध्ये निघालेले आहेत. औरंगाबादेतही महामोर्चात आम्ही सहभागी होत आहोत. -श्रद्धा होनराव …… स्वतंत्र लिंगायत धर्म पाहिजे हीच आमची मागणी आहे. शिख, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजाला अनेक सुविधा दिल्या जात आहेत. त्याप्रमाणेच समाजाच्या विकासासाठी सुविधा द्याव्यात. आमची मागणी आहे. -वैष्णवी घाटरे ……… कर्नाटक शासनाने केंद्र शासनाकडे लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा. यासाठी प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबत पाठपुरावा करावा. -अपर्णा अष्टीकर ……… लिंगायत समाजाला धार्मिक स्वातंत्र हवे आहे. हा आमचा घटनेतील तरतुदीनुसार, मुलभूत अधिकार आहे. हा अधिकार आम्हाला पुन्हा द्यावा हीच आमची मागणी आहे. -ज्योती कुरमुडे …… लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यतेसह अल्पसंख्याक दर्जा मिळावा. ही मागणी मान्य झाल्यास त्याचा लाभ लिंगायत समाजातील तरुणांना होणार आहे. त्यांना शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक लाभ मिळेल. -स्मृती माजूरकर ………… लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी. यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेले आहे. आतापर्यंत त्यावर संबंधितांकडून प्रतिक्रिया आलेली नाही. आमच्या मागणीला मान्यता देण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही मुंबईलाही मोर्चा काढू. -चेतन सौदंळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट