औरंगाबाद: समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी सरकारने आणखी १०० कोटी देण्याची तयारी दाखवली आहे. तेव्हा अगोदर लवकरात लवकर काम पूर्ण करा. शहरतील प्रत्येक घराला रोज पाणी द्या. नागरिकांना कमीत कमी पाणीपट्टीचा बोजा टाका. कारण पाणी पुरवणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे, अशी मागणी शहरवासीयांनी 'मटा'शी बोलताना केली. जायकवाडी धरणात मुबलक पाणी साठा असला तरी शहरवासींयाना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. अनेक नवीन वसाहतींना पाणी दिले जात नाही. हे अयोग्य आहे. सर्वांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना झाल्या पाहिजेत. - अलका बडवणे नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी सरकारने याआधीही पैसे दिलेले आहेत. आता पुन्हा देऊ केल्याचे वृत्त आहे, पण काम सुरू होऊन केव्हा संपणार आणि पुरेसे पाणी केव्हा मिळणार हाच खरा प्रश्न आहे. लोकांना परवडले या दराने पाणी मिळाले पाहिजे. - मनीषा चौधरी पाणी पुरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आजही चार चार दिवसआड पाणी मिळते. ही चांगली बाब नाही. राजकारण न करता लोकांना नियमित व पुरेसे पाणी कसे दिले जाईल, याचा विचार व्हायला पाहिजे. अन्यथा पालिका काय कामाची. - विकास कापसे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला केव्हा सुरुवात होणार हाच खरा प्रश्न आहे. यापूर्वीही सरकारने निधी दिला, मात्र काम सुरू झाले नाही. किमान आतातरी तातडीने काम सुरू झाले पाहिजे. लोकांवर अतिरिक्त बोजा पडणार नाही याची काळजी घ्यावी. - योगेश साबळे पाणीपुरवठा योजनेचे काम ठराविक कंपनीने करावे असे प्रयत्न का होत आहेत? त्या कंपनीला फायदा व्हावा, हाच त्यामागील हेतू तर नाही ना, अशी शंका येते. हे काम सरकारी एजन्सीमार्फत करा. नागरिकांना कमीत कमी पाणीपट्टी आकारा म्हणजे झाले. - प्रतीक गायकवाड
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट