म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अणि कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुरुवारी प्रवेश पूर्व परीक्षा (एमएचटी-सीईटी) घेण्यात आली. मराठवाड्यातून ७२ हजार ९२५ पैकी सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अनेक परीक्षा केंद्रावरील हॉलमध्ये घड्याळ नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करता आले नाही. तर, जिल्हा प्रशासनानेही परीक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. 'जेईई मेन्स'च्या धर्तीवर झालेल्या परीक्षेत फिजीक्स अवघड ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे घेण्यात आली. दोन सत्रात तीन पेपर झाले. सकाळी ९ वाजेपासून विद्यार्थी, पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. राज्यपातळीवरील या परीक्षेत 'नीट' प्रमाणे खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढे गांभीर्य दिसले नाही. जिल्हा प्रशासनाची जबाबदारी परीक्षेची होती, परंतु निरीक्षक वगळता कोणी परीक्षा केंद्राकडे फिरकले नसल्याचे चित्र होते. विद्यार्थ्यांना बॅग, घड्याळ प्रवेशद्वारावरच काढून ठेवण्यात आल्या, परंतु परीक्षा हॉलमध्ये घड्याळ नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करताना अडचणी आल्या. अशा परीक्षांमध्ये वेळेचे नियोजन किती महत्त्वाचे असते याचे भान ना प्रशासनाला ना परीक्षा केंद्रांना असल्याचे समोर आले. त्याबाबत अनेक केंद्रावर विद्यार्थ्यांनी तोंडी तक्रारही मांडण्याचा प्रयत्न केला. एमआयटी हायस्कूल, देवगिरी अशा केंद्रावर विद्यार्थ्यांनी सांगितले. सकाळचा पेपर १० ते ११.३० वाजता मॅथ्स विषयाचा त्यानंतर १२.३० ते २ वेळेत फिजिक्स आणि केमिस्ट्री तर, तिसरा पेपर ३ ते ४.३० या दरम्यान बायोलॉजीचा झाला. मराठवाड्यातून २३१ परीक्षा केंद्राहून परीक्षा झाली. परीक्षेला ७२ हजार ९२५ विद्यार्थी नोंदणी केली होती. यातील औरंगाबादमधून १८ हजार ३३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरात ५३ सेंटरवरून परीक्षा झाली. नोंदणी केलेल्यापैकी ९७ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 'फिजिक्स'ने वाढवले टेन्शन पेपरमध्ये फिजीक्स विषय आवघड गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. यंदा सीईटीतील प्रश्नांची काठिण्य पातळी जेईई मेनच्या प्रमाणे असेल असे सांगण्यात आले. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न इयत्ता बारावी अभ्यासक्रमावर ८० तर, २० टक्के अकरावी अभ्यासक्रमावर होते. विद्यार्थ्यांना बदलाबाबत उत्सुकता होती. प्रश्नपत्रिकेत फिजीक्सचा पेपर अवघड असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ... औरंगाबाद विभाग विषयनिहाय उपस्थिती... पेपर....... नोंदणी......उपस्थिती गणित..... २६४४६....२५६४८ भौतिक, रसायन.. ३९३९९....३८३०६ जीवशास्त्र.............३३०६१.....३२१२० .. 'सीईटी'तील बदलाबाबत कल्पना होती त्यानुसार तयारी केली होती. सांख्यिकी प्रश्नांची संख्या अधिक होती, परंतु पेपर सोपा होता. राजेश चौधरी .. बारावीसह अकरावी अभ्यासक्रमातील प्रश्न हा बदल छान वाटला. मॅथ्स, केमिस्ट्रीपेक्षा फिजिक्सचे प्रश्न सोडविण्यात अधिकचा वेळ गेला. ईश्वर वाघ .. फिजिक्स विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. त्यामुळे ते सोडविताना अडचण आली. विशेषत: त्यातील सांख्यिकी प्रश्नांची संख्याही अधिक होती. प्रतीक्षा म्हस्के ..
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट