म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबाद शहरात १२ मे रोजी पहाटे झालेल्या दंगलीत जखमी झालेला तरुण मुहीब यास घाटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार द्यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले. या दंगलीप्रकरणी केलेल्या याचिकेत सिटीचौक पोलिस ठाण्याचे हेमंत कदम यांच्यासह सर्व प्रतिवादींना नोटीस देण्याचे आदेशही न्यायालायाने दिले. जखमी मुहीब याची आई नसीमा बेगम यांनी ही याचिका केली आहे. त्या दोन मुले आणि दोन मुलींसह जिन्सीमध्ये राहतात. काही राजकीय व्यक्तींनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी दंगल घडवून धार्मिक रंग दिला आहे. १२ मे रोजी पहाटे पाच वाजता त्यांचा मुलगा मुहीब हा झोपला होता. पोलिसांनी त्यांच्या घराजवळ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मुहीबला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तो घराबाहेर पडला. तो घराबाहेर निघताच त्याच्यावर पोलिसांनी गोळीबार केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या गोळीबारात मुहीब गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्रथम घाटी हॉस्पिटल आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या फुफ्फुसामध्ये गोळी अडकली आहे. शस्त्रक्रिया केल्याशिवाय ही गोळी शरिराबाहेर काढता येणार नाही. परंतु, याचिकाकर्त्या नसीमा बेगम यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी मुहीबचा जीव वाचविण्यासाठी शासनाने उपचार द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. \Bपोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा \B निष्पाप नागरिकांवर गोळीबार करणारे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याची बाजू एस. एस. काझी यांनी मांडली. त्यांना सईद शेख, फातिमा काझी हे सहाय्य करत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट