म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ध्येयवादी पत्रकारितेपासून ते व्यावसायिक पत्रकारितेपर्यंत वाटचाल झाली आहे आणि आता इथून पुढे धंदेवाईक पत्रकारिता सुरू झाली आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. पेड न्यूज, फेक न्यूजचा 'व्हायरस' पत्रकारितेमध्ये घुसला आहे आणि 'अजेंडा' ठरवून पत्रकारिता केली जात आहे. त्यामुळे 'करप्शन' व 'क्रेडिबिलिटी' या दोन 'सी'चे पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे. त्याचवेळी पत्रकारांना स्पर्धा ही केवळ माध्यमातील पत्रकारांशी नव्हे, तर निरनिराळ्या विषयांवर लिहिणारे 'ब्लॉगर्स' व एकूणच सोशल मीडियातील लेखकांशीही आहे, हेही पत्रकारांनी ध्यानात घ्यावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांनी केले. विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण रविवारी (१ जुलै) महिला महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेट्टे, सचिव अंजली कोंडेकर, नागपूरचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांच्यासह पत्रकार, नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात 'मटा'चे चीफ कॉपी एडिटर मनोज कुलकर्णी यांच्यासह संगीता विवेक जोशी (जळगाव), पूनम मिश्रा (औरंगाबाद), वेस्ता पाडवी (जामली, ता. अक्कलकुवा, नंदूरबार) व रमेश जायभाये (औरंगाबाद) यांना नारद पुरस्करांने सन्मानित करण्यात आले. या निमित्त, पुरुष पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून महिला पत्रकार काम करीत असतानाही त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत पूनम मिश्रा यांनी व्यक्त केली. तब्बल ८५ टक्के पत्रकार हे कंत्राटी आहेत आणि त्यामुळेच पत्रकारांमध्ये अस्थिरता आल्याचे जायभाये म्हणाले. अनेक संकटे झेलत पत्रकार काम करीत असताना मिळालेली पुरस्काररुपी कौतुकाची थाप उत्साह द्विगुणीत करते, असे मनोज कुलकर्णी म्हणाले. शरद भोगले यांनी सूत्रसंचालन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट