म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने मराठवाड्याला दिलेल्या दुसऱ्या टप्प्यांतील ४०७ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत यातील १७२ कोटी रुपये (३५ टक्के) अनुदानाचे वाटप पूर्ण झाले आहे. ऐन पेरण्यांच्या वेळी बोंडअळी बाधितांना अनुदान वाटपाने दिलासा मिळाला असला, तरी तब्बल दोन वर्षांनंतर मराठवाड्यातील आठ लाख शेतकऱ्यांना मिळालेले ४९९ कोटी रुपयांची नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई अद्याप पडून आहे.
मराठवाड्यातील तब्बल २६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना १२२१ कोटी चार लाख रुपयांची आवश्यकता आहे, तीन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या या मदतीचा ३२५ कोटी ६० लाखांचा पहिला हप्ता वाटप करण्यात आल्यानंतर आता ४०७ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बोंडअळीच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू आहे, आठ दिवसांमध्ये यातील १७२ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यांतील सर्वाधिक ७५ टक्के नुकसान भरपाईचे वाटप बीड जिल्ह्यात झाले आहे. जालना जिल्हा पिछाडीवर असून, तेथे केवळ चार टक्के वाटप करण्यात आले आहे.
बोंडअळीबाधितांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानवाटपाची स्थिती
जिल्हा.................... शेतकरी संख्या................ रक्कम....................टक्केवारी
औरंगाबाद...................४१३७५....................९ कोटी ७३ लाख..........८.२१
जालना......................८३८८.....................४ कोटी ७५ लाख............४.३२
परभणी......................४३१३५...................२२ कोटी ७२ लाख..........३५.९६
हिंगोली......................१४५३५...................५ कोटी ९६ लाख..............४०.७४
नांदेड........................११२७५९................४८ कोटी ९१ लाख..............६९.४३
बीड............................१८९५३१.............७७ कोटी ९० लाख...............७५.९०
लातूर........................१३७३..................४१ लाख ९४ हजार...............१२.१९
उस्मानाबाद..................४७५३................१ कोटी ७० लाख................३१.६५
एकूण........................४१५९४९............१७२ कोटी १२ लाख...............३५.२४ टक्के
अतिवृष्टीची नुकसानभरपाई पडून
तब्बल दोन वर्षांनंतर मराठवाड्यातील आठ लाख ९५ हजार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी ४९९ कोटी १८ लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली असली तरी आठवड्याभरानंतरही हे अनुदान तिजोरीत पडून आहे. नेहमीच दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना २०१६मध्ये एप्रिल, मे, जून ते ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांमध्ये अतिवृष्टीने झोडपले होते.
अतिवृष्टीची भरपाई
जिल्हा.......................... शेतकरी ......................रक्कम
औरंगाबाद........................२०१९.......................५१ हजार
परभणी..............................३३५७.....................५ लाख ३५ हजार
हिंगोली..............................७९३४....................१ कोटी २७ लाख
नांदेड.................................४९३९३९...............२६१ कोटी ९५ लाख
बीड.................................१७८०१७................६८ कोटी १५ लाख
लातूर...............................९००२३...................५५ कोटी २१ लाख
उस्मानाबाद..........................१२०६४०..............११२ कोटी ६ लाख
एकूण...............................८९५९२९.................४९९ कोटी १८ लाख