म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद गेल्या काही दिवसांपासून शहरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटले असून आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. ही परिस्थिती हाताळण्यात जिल्हा प्रशासन ढिसाळपणा करत आहे. मुकुंदवाडी येथील सोमवारच्या आत्महत्येनंतर गुरुवारी (२ ऑगस्ट) दुपारी चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत एक तरुणाने आत्महत्या केली. या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यामुळे संतापलेल्या जमावाने रस्ता रोको करून जाळपोळ करण्यास सुरुवात केली. आत्महत्या केलेल्या उमेश एंडाईतच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह द्यावे, अशी मागणी उपस्थित मराठा समाजाने तसेच पुढाऱ्यांनी केली होती. घटनास्थळी येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य कराव्या, अशी अपेक्षा होती. मात्र रात्री सात वाजता सुमारास तलाठी, मंडळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे, तहसीलदार सतीश सोनी यांनी घटनास्थळी येऊन कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी तरुण व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी केली. मात्र मागण्या सांगा त्या मान्य करू हा प्रस्ताव जमावाने मान्य केला. या काळात दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना फोनवर परिस्थितीची जाणीव करून दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव शासनदरबारी पाठवण्याचे पत्र पाठवले. हे पत्र वाचताच उपस्थित संतापले आणि आम्हाला आश्वासन नको असे सांगितले. दरम्यानच्या काळात संतप्त जमावाने चिकलठाणा येथील मुख्य रस्ता बंद करून रस्त्यावर टायर जाळण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडे चौधरी कॉलनीत मोबाइलला रेंज नसल्यामुळे अधिकारी हैराण होते. रात्री साडेआठ वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित पत्र पाठवले. आर्थिक मदत व सरकारी नोकरी देण्यात येईल, रस्ता रोको स्थगित करावा, असे आवाहन सकल मराठा समाज क्रांती मोर्चाला पत्र दिले. त्यानंतर जमाव शांत झाला व आंदोलन मागे घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट