म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद छावणीवासीयांसाठी कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय छावणी परिषदेच्या २४ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये झाला होता, परंतु तब्बल नऊ महिने लोटले तरी या जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे काम रखडल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला १५ ऑगस्टची डेडलाइन मागेच देण्यात आली होती, मात्र आता तर ही डेडलाइनदेखील ओलांडली असून, काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. छावणी परिसरामध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला होता. तब्बल दहा ते बारा हजार नागरिकांचा गॅस्ट्रोचा फटका बसला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत निदान यापुढे तरी खाम नदीत पाणी दूषित होण्याची शक्यता राहू नये, यासाठी कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय झाला होता. या कामासाठी ४५ लाखांच्या निधीलादेखील तत्कालिन अध्यक्षांनी त्याच सभेत मान्यता दिली होती, मात्र हे काम किमान पाच ते सहा महिन्यांनंतर सुरू झाले. अत्यंत संथ गतीने व खंडित स्वरुपात होत आहे. अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. खाम नदीच्या पुलाला समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी नदीमध्ये कॉलम टाकण्याचे काम सुरू असून, हे कामदेखील पूर्ण झालेले नाही. प्रत्यक्षात जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू व्हायचेच आहे. याच गतीने हे काम होत राहिले तर हे काम पूर्ण होणार तरी कधी, असाही सवाल उपस्थित होत आहे. \Bपाणी दूषित होण्याची भीती कायम\B गेल्या नोव्हेंबरमध्ये खाम नदीतून गेलेल्या जलवाहिनीमध्ये पाणी दूषित झाले होते आणि जुलै महिन्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही जलवाहिनी तुटली होती. त्यामुळे ही जलवाहिनी दूषित होण्याची भीती कायम आहे व गॅस्टोचा पुन्हा एकदा फटका बसू शकतो. याच कारणास्तव जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी होत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाइन कंत्राटदाराला देण्यात आली होती, परंतु अडचणींमुळे हे काम पूर्ण झालेले नाही. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे आणि कंत्राटदाराने डेडलाईन ओलंडाल्यामुळे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचाही विचार होऊ शकतो. - प्रशांत तारगे, उपाध्यक्ष, छावणी परिषद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट