म. टा .प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या महिन्यापासून गायब झालेल्या पावसाने आठवड्याभऱ्यात दुसऱ्यांदा दमदार हजेरी लावून मंगळवारी (२१ ऑगस्ट) सकाळी साडेआठपर्यंत नांदेड व हिंगोली जिल्ह्यात दाणादाण उडवली. नांदेड जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे सहा जण वाहून गेल्याची घटना घडली. यातील चार जण मृत झाले असून, दोघांचा शोध सुरू आहे. मराठवाड्यातील एकूण ८३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी ८०.३५ मिलिमीटर पाऊस झाला. नायगाव तालुक्यातील मौ. बरबडा येथील गंगाराम मारुती दिवटे (वय ४० वर्षे), पारुबाई गंगाराम दिवटे (वय ३५ वर्षे) व अनसूया गंगाराम दिवटे (वय ६ वर्षे) हे जीपमधून (क्र. एमएच ३७ जी ५६११) मांजरमकडून नायगाव मार्गे बरबडाकडे जात होते. सोमवारी रात्री उशीरा जीप मांजरम पुलावर आली असता वाहून गेली. त्यांचे मृतदेह स्थानिक आपत्ती शोध व बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले. हिमायतनगर तालुक्यातील वडगाव येथील मारोती संग्राम बिरकुरे (वय ७० वर्षे), हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथील रहिवासी भारत हरिभाऊ तोरकड (वय ४२ वर्षे) हे दोघे नाल्यात वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे, तर नायगाव तालुक्यातील मौ. बेंद्री येथील रहिवासी विनायक बालाजी गायकवाड (वय ३० वर्षे) हे बेंद्रीच्या पुलावरून वाहून गेले. त्यांचा मृतदेह बेंद्री गावापासून एक किलोमिटर अंतरावर मंगळवारी सकाळी सापडल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यालाही पावसाने चिंब केले. त्यामुळे आता मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५८.२६ टक्के पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत अतिवृष्टी झालेल्या ८३ मंडळांपैकी सर्वाधिक ५९ महसुली मंडळे नांदेड जिल्ह्यातील आहेत. चोवीस तासात मराठवाड्यात ४२.५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ३५.८८ मिलिमीटर, जालना ३१.७५, परभणी ५१.९९, हिंगोली ६१.९६, नांदेड ८०.३५, बीड २७.७१, लातूर २८.४५, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २२.२८ मिलिमीटर पाऊस पडला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत मराठवाड्यात केवळ ५८.२६ टक्के एवढा पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४८.१७ टक्के, जालना ५७.२०, परभणी ५७.४१, हिंगोली ७२.०७, नांदेड ७३.५६, बीड ४४.४७, लातूर ५६.२२, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४८.०७ टक्के पाऊस पडला आहे. औरंगाबाद व बीड या जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस झाल्यामुळे हे जिल्हे सरासरीच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. प्रारंभी पाऊस झालेल्या उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यालाही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
\B२६ तालुक्यात निम्माही पाऊस नाही\B
तब्बल महिनाभराच्या मोठ्या खंडानंतर १६ आणि २१ ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला. यामुळे एकूण टक्केवारीत पावसाने अर्धा पल्ला गाठला असला, तरी मराठवाड्यातील तब्बल २६ तालुक्यांमध्ये अद्याप निम्माही पाऊस झाला नाही. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ पैकी सहा तालुक्यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील तीन, नांदेडमधील एक, बीडमधील आठ, लातूर तीन तर उस्मानाबाद तालुक्यातील तब्बल पाच तालुक्यांचा समावेश आहे. सध्या औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यात चारशेवर टँकर सुरू आहेत.
\B
अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे
- औरंगाबाद\B - वडोदबाजार, बनोटी, चिंचोली लिंबाजी
\B- जालना -\B तळणी
\B- परभणी -\B पिंगळी, पालम, पूर्णा, ताडकळस, देऊळगा, पाथरी व हदगाव
\B- नांदेड - \Bनांदेड, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, लिंबगाव, तरोडा, मुदखेड, मगट, बारड, अर्धापूर, दाभाड, मालेगाव, भोकर, निनी, मोगाळी, मातुळ, उमरी, सिंधी, गोळेगाव, कंधार, कुरुला, उस्मानपूर, पेठवडजा, फुलवळ, बरुळ, लोहा, माळाकोळी, कलंबर, सोनखेड, शिवडी, कापशी, किनवट, जलधारा, शिवणी, हदगाव, तामसा, पिंपरखेड, तळणी, आष्टी, हिमायतनगर, सरसम, जवळगाव, खनपूर, शहापूर, बिलोली, आदमपूर, लोहगाव, कुंडलवाडी, धर्माबाद, जरीकोट, करखेली, नायगाव, नरसी, मांजरम, बरवडा, कुंटुर व मुखेड
\B- हिंगोली - \Bहिंगोली, माळहिवरा, सिरसम बु., वासंबा, कळमनुरी, नांदापूर, आ. बाळापूर, हयातनगर, औंढा नागनाथ, जवळाबाजार, येळेगाव व साळना\B
- बीड -\B पिंपळगाव गाडे