म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद औरंगाबाद शहरातील कचरा खुलताबाद येथे म्हैसमाळ रोड व उरूस मैदानातील कब्रस्तान परिसरात कचरा टाकण्यात येत आहे. हा प्रकार शनिवारी रात्री एक वाजता उघडकीस आला. याप्रकरणी हजरत ख्वाजा शेख मुन्तजिबोद्दिन दर्गा कमिटीचे सचिव मोईनोद्दिन शरफोद्दिन यांच्या फिर्यादीवरून औरंगाबाद महापालिकेचे वॉर्ड अधिकाऱ्यांसह पाच जणांवर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री एकच्या सुमारास दोन टिप्पर म्हैसमाळ रस्त्याने जातांना दिसले. उरूस मैदानावर कचरा टाकून ते परत जाताना दुर्गंधी पसरली, त्याचवेळी तिसरा टिप्पर त्याच दिशेने जाताना दिसल्याने काही तरुणांनी टिप्परचा पाठलाग केला. त्याचवेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू हे तेथे आले. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना बोलावले. म्हैसमाळच्या दिशेने गेलेले टिप्पर नागरिकांनी पकडून खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. 'झोन अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी खुलताबाद येथे जाऊन राजेश जाधव सांगतील तेथे कचरा टाकावा,' असे सांगितल्याचे टिप्परसोबत सापडलेल्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरात सहा महिन्यांपासून कचऱ्याची समस्या तीव्र झाली असून पालिकेचे कचरा टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. खुलताबाद परिसरात रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी कचरा आणून टाकला जात आहे. सद्यस्थितीत खुलताबाद ते वेरूळपर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे दिसत आहेत. मात्र, त्याचा वाऱ्याने उडून हा कचरा वस्त्यांच्या परिसरात येत आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम न करता इतर शहर, गावांच्या परिसरात टाकण्याचा सोपा उपाय औरंगाबाद महापालिकेने शोधल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. \Bयांच्यावर गुन्हा दाखल \B मनपा झोन तीनचे वॉर्ड अधिकारी मुकुंद कुलकर्णी, खालेद खान नवाज खान, रफिक रशीद शेख, सागर गणपत माने (सर्व रा. हुसेननगर, पुंडलिकनगर औरंगाबाद), राजेश जाधव (रा. खुलताबाद) यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६०चे कलम २६९,२७०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एक टिप्पर (एम एच २० बी टी ३२१) ताब्यात घेतले आहे. \Bस्थानिकांत नाराजी \B खुलताबाद येथे पर्यटक व भाविक सतत भेट देतात. वनराईने नटलेल्या या परिसरात निसर्ग पर्यटनासाठीही अनेकजण येतात. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात खुलताबाद नगर पालिका काहीच करत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. औरंगाबाद महापालिका हद्दीमधील मोकाट कुत्रेही खुलताबाद परिसरात आणून सोडतात. आता कचरा टाकला जात आहे. कचरा टाकण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ असूनही ते पालिका भवनातच बसून राहतात. नेमून दिलेल्या हद्दीत पाहणी करत नाहीत. त्यांच्यावर पालिका आयुक्त यांचे नियंत्रण नसल्याचे दिसते. यापुढे महापालिकेने खुलताबाद परिसरात कचरा टाकल्यास आंदोलन केले जाईल. - कैसरोद्दीन, माजी नगराध्यक्ष
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट