म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद - कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक (कलेक्शन अँड ट्रांसपोर्टेशन) करण्यासाठीच्या कंत्राटदाराने वाटाघाटी अंती मूळ किंमतीच्या फक्त नऊ रुपये कमी केले आहेत. कमी केलेल्या रक्कमेसह या कंत्राटदाराला काम देण्याबद्दलचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे. कचऱ्याचे संकलन आणि वाहतुक करण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. प्राप्त झालेल्या निविदांमधून बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची निविदा तुलनेने कमी दराची असल्यामुळे या कंपनीची निविदा अंतिम करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कार्यवाही सुरू केली. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कंपनीच्या प्रतिनिधींना वाटाघाटीसाठी बोलावण्यात आले. वाटाघाटीनंतर कंपनीने मुळ किंमतीच्या नऊ रुपये कमी करण्याची तयारी दाखवली. कंपनीने निविदेमध्ये १८७२ रुपये प्रतिदिवस असा दर भरला होता. वाटाघाटीनंतर १८६३ रुपयांवर काम करण्यात तयारी दाखवण्यात आली. आता या कंपनीबरोबर करार करून निविदा अंतिम करणे व कंपनीला कार्यादेश देणे यासाठी स्थायी समितीच्या समोर प्रस्ताव ठेवला जाणार आहे. हर्सुल येथील साईटवर 'ओपन टेक्नॉलॉजी' च्या माध्यमातून कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मायो वेसल्स आणि हायक्युब या दोन कंपन्यांच्या निविदा महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. पालिकेच्या यंत्रणेकडून तांत्रिक कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. सोमवार किंवा मंगळवारी निविदेतील 'फायनांशियल बीड' उघडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी कमल गॅस, जैन अँड ड्राय कंपनी, बॅको कंपनी या तीन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. पुढील आठवड्यात या निविदा उघडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी आणि हर्सुल येथील साईटवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी एमजीएम संस्थेच्या मदतीने बायोकल्चर फवारणीचे काम केले जाणार आहे. यामुळे दुर्गंधी कमी होईल आणि माशांचा त्रास देखील होणार नाही असा पालिका प्रशासनाला विश्वास आहे. -
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट