म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या ऑडिओ क्लिपमधील वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थी संघटनांशी पक्षपातीपणा करण्याची चूक कुलगुरूंनी केली. विद्यार्थिनींच्या आंदोलनाची खिल्ली उडवल्याने कुलगुरूंची संवेदनशीलता समजली अशी टीका विद्यार्थ्यांनी केली. डॉ. चोपडे यांच्या वक्तव्याची तक्रार उच्च शिक्षण विभागात करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्याची व्हायरल झालेली कथित ऑडिओ क्लिप शैक्षणिक वर्तुळात रोष निर्माण करणारी ठरली आहे. विद्यार्थी संघटनांच्या वादात एका संघटनेच्या बाजुने अनुकूल मत मांडत कुलगुरूंनी दुसऱ्या संघटनेला झालेल्या मारहाणीचे समर्थन केले. याबाबत 'कुलगुरूंचे दणके व्हायरल' हे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने गुरुवारी प्रसिद्ध केले. या वृत्ताची दिवसभर चर्चा सुरू होती. विद्यार्थ्यांना समान वागणूक देण्याऐवजी कुलगुरू पक्षपातीपणा करीत असल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली. विद्यापीठ वर्तुळात शैक्षणिक धोरणावर चर्चा होण्याऐवजी राजकारण वाढल्याचे क्लिपच्या माध्यमातून उघड झाले. या राजकारणाला कुलगुरूंचे पाठबळ असल्याचा आरोप सुरू झाला आहे. दर्जेदार उच्च शिक्षणासाठी निकोप वातावरण निर्माण करणे कुलगुरूंची जबाबदारी असते. मात्र, स्वत:चा गट तयार करून वातावरण दूषित करण्यात कुलगुरू सक्रिय आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गटबाजीत विद्यापीठाचे प्रचंड नुकसान झाले. विद्यापीठ विद्यार्थीकेंद्रीत असल्याचा धोशा कुलगुरू नेहमी लावतात, पण विद्यार्थ्यांच्या समस्या वाढलेल्या असूनही कुलगुरूंनी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत. वसतिगृहांची बिकट अवस्था आहे. दर आठ दिवसांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही. उलट कुलगुरुंनी 'हौशा-गवशांचे' आंदोलन म्हणत हेटाळणी केली आहे. या क्लिपमुळे चोपडे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. दरम्यान, शहरातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उच्च शिक्षण विभागाकडे ऑडिओ क्लिपसह कुलगुरू चोपडे यांची तक्रार केली आहे. कुलगुरूंचे धोरण संधीसाधू लोकांसाठी असून विद्यार्थी वाऱ्यावर असल्याचा तक्रारीचा सूर आहे. या वक्तव्यावर चोपडे यांनी अजून खुलासा केलेला नाही. \Bआर्थिक व्यवहार चव्हाट्यावर ? \Bकॅरिऑन, विद्यापीठातील बांधकामे, साहित्य खरेदी आणि परीक्षा नियोजनात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. कुलगुरूंच्या ऑडिओ क्लिपमधील संवाद ऐकल्यानंतर कॅरिऑन प्रकार संशयास्पद असल्याची शक्यता बळावली आहे. मागील कॅरिऑनमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला का, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहारातील दोषींची चौकशी करण्याची मागणी जोर धरीत आहे. काही दिवसांपूर्वी चोपडे यांच्या चौकशीचा अहवाल पाटील समितीने राज्य सरकारला सादर केला. या अहवालातील शिफारशीनुसार शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून न्यायिक कक्षेत कारवाई व्हावी अशी मागणी आहे. याबाबत कुलगुरूंची भेट घेणार आहोत. कुलगुरू विद्यापीठाचे पालक असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. हिटलरशाही करू नये. - अभिजित पाटील, प्रदेशमंत्री, अभाविप स्वत:ला वाटेल त्या पद्धतीने कुलगुरू कारभार करीत आहेत. किमान त्याची जाहीर वाच्यता त्यांनी करू नये. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे नाव असलेल्या विद्यापीठाचे प्रतिमाहनन होते. कुलगुरू शिक्षण क्षेत्रात द्वेष निर्माण करीत आहेत. - डॉ. मारोती तेगमपुरे, पदाधिकारी, 'बामुक्टो'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट