म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर पावसात ६० दिवसांहून अधिक खंड पडला. त्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके जळाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. जलसाठे कोरडे झाल्यामुळे जनावरांना व माणसांना पिण्याचे पाणी गावात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आपल्या गटात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी ६१ जिल्हा परिषद सदस्यांना दिले आहे.
या पत्रात डोणगावकर यांनी सदस्यांना म्हटले आहे, की आपल्या गटातील गावामध्ये जिथे शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थ रोजगार मागतील त्यांची नोंदणी केलेली नसल्यास सर्वप्रथम ती करावी, जॉबकार्ड काढून घेऊन कामाची मागणी नमुना क्रमांक चारमध्ये संबंधित ग्रामपंचायतींकडे करण्याबाबत मजुरांना परावृत्त करून मागणी केलेल्या कामाबाबतची पोच पावती घेण्याबाबत मजुरांना सूचना द्याव्यात, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जलसंधाण व मृदसंधारणाची कामे हाती घ्यावीत, त्यात प्रामुख्याने विहिर फेरभरण, कंपार्ट बंडिंग, रिचार्ज शाफ्ट, पाटबंधारे प्रकल्पातील गाळ काढणे, मातीनाला बांध अशा प्रकारची कामे आहेत. ही कामे झाली तर पुढे पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. आपल्या गटातील ज्या नळ योजना नादुरुस्त असतील किंवा उदभव खोल करणे आवश्यक आहे अशी कामे तातडीने प्रस्तावित करावेत, तसेच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे नियोजनाबाबतचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्याकडे तातडीने प्रस्तावित करण्यात यावेत, असे पत्रात म्हटले आहे.
\Bटंचाई आरखड्याचा तालुक्यांना विसर\B
यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता पंचायत समिती स्तरावरून टंचाई आराखडा तयार होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासन परतीच्या पावसावर अवलंबून राहिले. त्यामुळे यंदाचा टंचाई आराखडा अद्याप तयार झालेला नाही. २२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर करावयाचा आहे. अद्याप गंगापूर आणि फुलंब्री तालुक्यांनी टंचाई आराखडा सादर केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अध्यक्षांच्या तालुक्यानेच टंचाई आराखड्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आता काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील पाऊस
- जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ५३.३१ टक्के पाऊस पडल्याची नोंद
- खुलताबाद तालुक्यात यंदा केवळ ४०.३६ टक्के पाऊस
- जिल्ह्यातील ६५पैकी २४ मंडळांमध्ये २५ ते ५० टक्के पाऊस
- ३३ मंडळांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडल्याची नोंद
- आठ मंडळांत ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान पाऊस
- जिल्ह्यातील एकाही मंडळात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नाही