म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
'वैजापूर व गंगापूर या दुष्काळी तालुक्यांसाठी असलेल्या नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्याचे हक्काचे पाणी भविष्यात सुरक्षित ठेवायचे असेल, तर पाणी वापर संस्था सक्रिय करा. अन्यथा लाभधारक शेतकऱ्याचे हक्काचे पाणी आरक्षणाच्या नावाखाली दुसरीकडे वळवले जाईल. हक्काच्या पाण्यासाठी जागरुक राहा आणि संघटीत होऊन व्यवस्थेविरुद्ध लढा द्या,' असे आवाहन शेतकरी मित्र प्रतिष्ठाणचे डॉ. राजीव डोंगरे यांनी केले.
वैजापूर येथे रविवारी झालेल्या शेतकरी परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या शेतचाऱ्यांची अपूर्ण कामे, भूसंपादन, आवर्तन, हक्काचे ११ टीएमसी पाणी मिळण्यासंदर्भात विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. परिषदेला ओझर येथील महात्मा फुले पाणी वापर संस्थेचे गोवर्धन कुलकर्णी, रवींद्र शिरोडे, पुरुषोत्तम वाणी, अभिजित धामणे, किरण राऊत, पाटबंधारे विभागाचे अविनाश डुडुर, डॉ. विजया डोंगरे, माधवानंद महाराज, पंडित शिंदे, कोपरगावचे संजय जामदार व लाभक्षेत्रातील शेतकरी रमेश सावंत आदींची उपस्थिती होती.
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी निर्माण करण्यात आलेला नांदूर-मधमेश्वर जलदगती कालवा प्रकल्प पूर्ण होऊन १५ वर्षांचा कालावधी उलटला. पण अद्याप शेतचाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. हक्काचे ११ टीएमसी पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळत नाही. प्रकल्पातील हक्काच्या मुकणे धरणावर नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत व विविध गावांसाठी नगर पालिका व महापालिकेने आरक्षण टाकल्याने मराठवाड्याचे हक्काचे पाणी वळवण्यात आले. विविध वितरिकांवर व नांदूर-मधमेश्वर धरणाच्या मुखाशी पाणी सोडतांना इलेक्ट्रॉनिक गेट नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी होते. परिणामी येथील लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, याबद्दल परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वास्तविक जलदगती कालव्यावर औद्योगिक वसाहतीस
११ टक्के व पिण्यासाठी १५ टक्के आरक्षण टाकण्याची तरतूद आहे. हे आरक्षण टाकले असते, तर वैजापूर व गंगापूर येथे औद्योगिक वसाहत व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता. या पुढील काळात हक्काच्या पाण्यासाठी पाणीवापर संस्था सक्षम करणे गरजेचे आहे, तसेच पाण्याची शंभर टक्के मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गायत्री म्हस्के यांनी केले.
\Bपरिषदेतील ठराव\B
कालव्याच्या चाऱ्या व पोटचाऱ्यांची कामे पूर्ण करावी, त्यासाठी लागणारा निधी तातडीने मंजूर करावा, शेतचाऱ्या व कालव्याची साफसफाई करावी, पाण्याची शंभर टक्के मागणी नोंदवावी, मुकणे व इतर धरणांवरील आरक्षण हटवावे, आरक्षणाचा अनुशेष अप्पर वैतरणा धरणातून पूर्ण करावा, नांदूर-मधमेश्वर कालव्यावर वैजापूरसह १०२ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना टाकावी, वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी औद्योगिक वसाहतीसाठी आरक्षण द्यावे, धरणाच्या मुखाशी इलेक्टॉनिक गेट बसवावे, जलमापन यंत्रणा बसवावी, सर्व पाणी वापर संस्थाची शिखर संस्था करावी आदी ठराव मंजूर करण्यात आले.