म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पूर्णा ते नांदेड नाका रोडवर २५ ऑगस्ट २०१८ रोजी शाळकरी मुलीला कारचा धक्का लागल्याचा आरोप करीत लोखंडी रॉडने एकाला गंभीर मारहाण करणाऱ्या १५ आरोपींविरोधात दंगलीचा तसेच मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी औरंगाबाद जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, तो विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला. या प्रकरणी हाजी खलील कुरेशी (रा. शास्त्रीनगर, ता. पूर्णा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २५ ऑगस्ट २०१८ रोजी फिर्यादी हा पूर्णा येथून नांदेडला औषधी आणण्यासाठी कारचालक सुलेमानसह कारने निघाला होता. त्यावेळी पूर्णा ते नांदेड नाका रोडवर फिर्यादीच्या कारसमोर आणखी एक कार होती. त्या कारसमोर एक शाळकरी मुलगी आली असता समोरच्या कारचालकाने ब्रेक मारला व ती मुलगी निघून गेली. त्यानंतर समोरची कारही निघून गेली. दरम्यान, फिर्यादीची कार परिसरातील एका गॅरेजसमोर आली असता, आरोपी सोमनाथ शिराळे व इतर दहा ते पंधरा जणांनी मुलीला कारने धक्का दिल्याचा आरोप करीत फिर्यादीला शिविगाळ करीत मारहाण केली. फिर्यादीने मारहाणीचा जाब विचारला असता, आरोपींनी फिर्यादीला लोखंडी रॉडने गंभीर स्वरुपाची मारहाण केली. यात फिर्यादीचा हात फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन अतुल पंडतराव बाबर (३०), विष्णू परसराम कदम (३०), तुकाराम बालाजी कदम (३२), अमोल पंडित कदम बाबर (२८), दीपक गणपत कहारे (२८), गोविंद अमृत सोलव (४०), प्रदीप शिवचरण पारवे (२२), विनोद विनायक पारवे (३०), कल्याण भुजंग कदम (३०), विक्रम विनायक कदम (३४), सचिन उर्फ पप्पू शंकर कदम (३२), मुंजा उर्फ संकेत शंकर कदम (३६), किशन नवनाथ सोलव (२४), मुंजा अच्युत कदम (३०), सोमनाथ बालाजी शिराळे (२५, सर्व रा. पूर्णा) या आरोपींविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात भादंवि ३२६, १४३, १४७, १४८, १४९ कलमान्वये तसेच मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती व त्यांना पूर्णा कोर्टाने जामीन मंजूर केला होता, तर उर्वरित आरोपी अजूनही फरार आहेत. दरम्यान, संघटित गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. \Bफरार आरोपींना अटक करणे बाकी \Bआरोपींविरुद्ध 'मोक्का'न्वये गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व १५ आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद जिल्हा कोर्टात अर्ज दाखल केला असता, आरोपींवर अनेक गंभीर स्वरुपाचे दाखल गुन्हा असून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे बाकी आहे. त्याचवेळी फरार आरोपींना अटक करावयाची आहे आणि आरोपींना अटक केल्याशिवाय गुन्ह्याचा तपास करता येणार नाही. तसेच आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे आरोपींचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती विशेष सहाय्यक सरकारी वकील राहू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट