म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबाद विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सीमा शुल्क (कस्टम) विभागाकडून विमानतळात कार्गोसाठी असलेल्या सॉफ्टवेअर बसविणे बाकी आहे. त्यामुळे या सुविधेला अद्याप प्रारंभ झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील शेती उत्पादित मालासह अन्य औद्योगिक उत्पादने कमी वेळेत थेट विदेशात नेता यावीत, यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर विमानतळावर देशांतर्गत कार्गो सुविधेसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली. पूर्वी देशांतर्गत कार्गो पाठविण्याचे काम संबंधित विमान कंपन्यांकडूनच केले जात होते. आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी जुन्या विमानतळाच्या जागेवर देशांतर्गत कार्गो आणि आंतरराष्ट्रीय कार्गोसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. त्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आले. तेथे देशांतर्गत कार्गो सेवा दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा देण्यासाठी कामाची सुरवात करण्यात आली. काम पूर्ण झाल्यानंतर या जागेची विशेष केंद्रीय दक्षता पथकाकडून पाहणी करण्यात आली होती. या पथकाने काही आवश्यक बदल सुचविले होते. या बदलानंतर पुन्हा समितीची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधेचे काम काही दिवस रखडले होते. यानंतर औरंगाबाद विमानतळ संचालकपदी पुन्हा डी. जी. साळवे यांच्या नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधेच्या उभारणीला वेग आले. त्यांनी कार्गो सुविधेच्या उभारणीचे काम पूर्ण करून संबंधित दक्षता समितीकडून मान्यताही घेतली. याशिवाय या कार्गो सेवा चालू करण्यापूर्वी स्कॅनिंग मशीन, लिफ्टर आणि इतर आवश्यक साधन सामग्रीही मागविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कस्टम विभागाकडून आंतरराष्ट्रीय नियमानुसार कार्गो तपासणी करण्यासाठी सॉफ्टवेअर बसविण्याची आवश्यक आहे. या सॉफ्टवेअर बसविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने कस्टम विभागाकडे मागणी केली आहे. तीन महिन्यांपासून विमानतळ विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र अद्याप सॉफ्टवेअर बसविण्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, कस्टम विभागाने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये कार्गो सुविधेसाठी सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन प्रक्रियेसाठी दिल्लीच्या मुख्यालयाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती विमानतळ विभागाच्या सूत्रांनी दिली. …… \Bउद्योजकांनी घेतला पुढाकार\B आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी शहरातील उद्योजकांनी पुढाकार घेतला होता. नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू शहरात आले असताना, त्यांच्याशी कार्गो सुविधा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी पुढाकार घेतल्याने, कार्गोच्या सुविधेला वेग आला होता. ……… \Bआंतरराष्ट्रीय कार्गोचा असा होईल फायदा\B औरंगाबाद, खान्देश, नगर आणि मराठवाड्यातील विविध भागातील कृषी माल, औषध निर्मिती कंपन्या, ऑटोमोबाइल क्षेत्रातील माल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठविण्याची सोय औरंगाबाद विमानतळावरून उपलब्ध होणार आहे. मटा भूमिका कार्गो सेवा लवकर सुरू व्हावी औरंगाबाद विमानतळावर कार्गो सुविधा सुरू करण्याचे काम गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कस्टम विभागाच्या सॉफ्टवेअरची कार्गो सेवेला प्रतीक्षा आहे. मराठवाड्यातील कृषी उत्पादने, त्याचबरोबर औरंगाबादच्या परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील उत्पादने निर्यात करण्यासाठी कार्गो सुविधा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सरकारची घोषणा प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती दीर्घ प्रतीक्षा करावी लागते, हे कार्गो सेवेच्या उभारणीतील संथपणावरून लक्षात येऊ शकते. निर्यातीची सुविधा उपलब्ध झाल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल. मागास भागात एखाद्या सेवेची उभारणी करताना सरकारने विशेष लक्ष देणे गरजेचे असते. अशा भागांमध्ये एखादी सेवा घोषणेनंतर लवकर उभारल्यास त्यातून परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते. असे असतानाही मोठी आणि विकसित शहरांतील कामांकडेच सरकारचे लक्ष असते, असा आजवरचा अनुभव आहे. आणि तोच अनुभव औरंगाबाद विमानतळावरील कार्गो सेवेतील विलंबाच्या निमित्ताने येत आहे. केंद्र सरकारच्या अख्त्यारितील कस्टम विभागाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेले काम लवकर करावे, यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरून पाठपुरावा झाला पाहिजे. त्याचबरोबर मराठवाड्यातील खासदारांनी एकत्रितपणे केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट