म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी बहुतांश भूसंपादन पूर्ण करण्यात आले असले, तरी जिल्ह्यात अद्यापही संपादन न करता आलेली १०५ हेक्टर जमीन आता सक्तीने ताब्यात घेण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोबदल्यातही एक पटीचा फटका बसणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी, कान्हापूर, जयपूर, गंगापूर जहांगीर, वरूड काजी, सावांगी, महालपिंप्री, कृष्णापूरवाडी, बकापूर, जळगाव फेरण, कोनेवाडी, शेवगा, भांबर्डा, नायगाव, भिकापूर, करंजगाव, जटवाडा, जोगवाडा, ओहोर, अब्दीमंडी, माळीवाडा, गावंदरी तांडा, रहाळपट्टी तांडा, दुधड आदी गावांमधील ४१० खातेदारांनी संपादनाची संमती दिली नसल्यामुळे यांच्या सुमारे ७० हेक्टरचे संपादन सक्तीने करण्यात येणार आहे. सक्तीच्या भूसंपादनात वैजापूर व गंगापूर तालुक्यांत औरंगाबादच्या तुलनेत संख्या कमी आहे. समृद्धी महामार्गातील प्रत्येक गावात कमी अधिक प्रमाणात विनासंमती असल्यामुळे सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असले, तरी घायगाव, लासूर गाव, जांभाळा व डोणगाव; तसेच इतर गावांमधील एकूण ६५ शेतकऱ्यांची सुमारे ३५ हेक्टर जमिनीचे संपादन सक्तीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची गेल्या काही दिवसांत जोरात धावत असली तरी अद्यापही जिल्ह्यातील भूसंपादनाची अवस्था 'हत्ती गेले शेपूट राहिले' अशी आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ३० जून २०१७ रोजी समृद्धीच्या भूसंपादनासाठी जमिनीच्या प्रतवारीनुसार खरेदीचे दर जाहीर केले होते, यानंतर जुलै २०१७मध्ये जिल्ह्यात प्रशासनाला पहिली रजिस्ट्री करण्यात यश मिळाले, मात्र त्यानंतर मोठ्या खंडानंतर पुन्हा जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार दर्शवला सध्या समृद्धी महामार्गासाठी तीनही तालुक्यातुन आवश्यक असलेल्या १२४७.७२ हेक्टरपैकी सुमारे ९० टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. आता दीड वर्षानंतर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे चित्र आहे. \Bसमृद्धी महामार्ग \B- मुंबई-नागपूर : ७१० किलोमिटर - औरंगाबाद जिल्ह्यात : ११२ किलोमीटर - जिल्ह्यातील तालुके : औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर - एकूण गावे : ६२ - आवश्यक भूसंपादन : १२४७ हेक्टर - समृद्धीबाधित शेतकरी : ३०५४
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट