म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कलचाचणी व अभिक्षमता कसोटी' मंगळवारपासून राज्यभर सुरू झाली. संगणकावर घेतलेली परीक्षा यंदा 'मोबाइल अॅप' द्वारे घेतली जात आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची यादी न दिसणे, अॅप न दिसल्याने काही तास प्रक्रियाच हँग झाली. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळेकडे स्मार्टफोन नसल्याने थेट विद्यार्थ्यांमार्फत पालकांना गळ घातली जात आहे. शिक्षण विभागाच्या गलथान नियोजनामुळे पालकांचीही पुरती तारांबळ उडते आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला कल पाहून करिअर निवडता यावे या हेतुने दोन वर्षांपासून कलचाचणी सुरू झाली. ऑफलाइन, ऑनलाइन अन् संगणक करत आता मोबाइल अॅपद्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. १८ डिसेंबर ते १७ जानेवारीपर्यंत शाळांना कलचाचणी पूर्ण करायची आहे. मोबाइलवर होत असलेल्या कलचाचणीसाठी स्मार्टफोन कसा असावा, तो किती इंची असावा अशा सूचना आहेत. आज सकाळी सुरुवात झाली. मात्र, सर्व्हर हँग झाले. त्यामुळे ज्या शाळांना प्रक्रिया करायची होती त्यांना काही कळेना. संबंधितांना फोन करत प्रक्रिया सुरळीत होण्यापर्यंत ताटकळत बसावे लागले. तेवढा वेळ विद्यार्थ्यांनाही ताटकळत बसावे लागले. साडेअकरानंतर अॅप, विद्यार्थ्यांची यादी दिसू लागली अन् प्रक्रियेला सुरुवात झाली. मोबाइलचे नियोजन करण्याचे अनेक शाळांना यश आले नाही. शिक्षकांकडे स्मार्टफोन पुरेसे नसल्याने विद्यार्थ्यांना घरून मोबाइल आणण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. शिक्षण विभागाने तशा तोंडी सूचना दिल्या. स्मार्टफोनसाठी पालकांकडे तगादा लावला जात असल्याने पालकही गोंधळले आहेत. या चाचणीसाठी ज्या प्रकारच्या सुविधांचा फोन हवा तसा अनेक पालकांकडे नाही. त्यामुळेही पालकांची फरफट होते आहे. यासह 'कलचाचणी व अभिक्षमता कसोटी' प्रत्येकाला आयडी, पासवर्ड दिला जाणार आहे. अशावेळी पासवर्ड मुलांना कळाला तर त्याबाबत माहिती लिक होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
पालकांकडूनच मोबाइल आणा
दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता मोबाइलच उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळांमधील शिक्षकांनाही स्मार्ट फोन कोठून आणायचे असा प्रश्न आहे. एका विद्यार्थ्याला दीड तास कालावधी देण्यात आला. काही शाळांमध्ये शंभर, दोनशे काही ठिकाणी ही संख्या पाचशे, सहाशेपेक्षा अधिक आहेत. तेवढ्या संख्येने मोबाइल उपलब्ध नसल्याने शाळांनी थेट पालकांकडे गळ घातला आहे. विद्यार्थ्यांना पालकांकडून मोबाइल आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. शाळेत मोबाइलला बंदी म्हणता अन् मोबाइल आता का? असा प्रश्न ही पालक उपस्थित करत आहेत. औरंगाबाद विभागात दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८६ हजार ६६ एवढी आहे. विद्यार्थी संख्येचा विचार करता मोबाइल कोठून आणायचे असा प्रश्न उपस्थित झाला. राज्यात दहावीला १७ लाख विद्यार्थी बसतात. १७ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तेवढ्या वेळात प्रक्रिया पूर्ण करणे शाळा व्यवस्थापनांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
अशी आहे चाचणी
कलचाचणी मानसशास्त्रीय कसोटी आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीकोनातून कृषी, ललित कला, वाणिज्य, तांत्रिक, कला, संरक्षण सेवा, आरोग्य विज्ञान असे सात क्षेत्राबाबत कल तपासला जाणार आहे. त्यामध्ये १४० प्रश्न आहेत जे ७५ मिनीटात सोडवायचे. 'अभिक्षमता कसोटी'मध्ये भाषीय, तार्किक, अवकाशीय आणि संख्यात्मक असे टप्प्यावर प्रश्न आहेत. बौद्धिक लेवलेचे प्रश्न असून काठिण्य पातळी अधिक आहेत.
दहावी विद्यार्थी आकडेवारी
जिल्हा............ विद्यार्थी संख्या
औरंगाबाद...... ६५८७०
बीड................ ४३७०१
परभणी............ २८८२४
जालना............. ३१४०६
हिंगोली............. १६६५८
..
एकूण दहावीचे विद्यार्थी...१८६०६६
..
कल व अभिक्षमता कसोटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दीड तास कलावधी आहे. त्यासाठी स्मार्टफोन, पाच इंचापेक्षा मोठा मोबाइल आवश्यक आहे. शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांकडे मोबाइल उपलब्ध करून घेणे कसे शक्य आहे. संख्या, वेळ याचा विचार तरी करण्याची गरज होती.
अलका खोडे,
मुख्याध्यापक,
जागृती हायस्कूल.
सरकारचा उपक्रम सकारात्मक आहे. मात्र, त्यात लवचिकता असायला हवी. संगणकावर असताना नियोजन करणे सोपे होते. स्मार्टफोन प्रत्येकाकडे एखादा असू शकतो विद्यार्थी संख्या तशी नाही. शिक्षक अॅडजेस्ट करू शकतात. मात्र, त्यालाही मर्यादा आहेत. विद्यार्थी, पालकांची धावपळ ही योग्य नाही.
शेख जमील अहमद
समुपदेशक
कलचाचणी घ्यायची असल्याने आम्ही तसे नियोजन चार दिवसापूर्वीच केले. आमच्याकडे सत्तर विद्यार्थी आहेत. एकाचवेळी तेवढ्या विद्यार्थ्यांची कलचाचणीसाठी मोबाइल उपलब्ध होत नसल्याने आम्ही बॅच केल्या. आज २० विद्यार्थ्यांची घेतली. यासह तसेच पुढचे नियोजन केले आहे. कलचाचणीबाबत विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला.
शैला धुमाळ
मुख्याध्यापक,
श्रेयस माध्यमिक विद्यालय.
कलचाचणीचा टप्पा अतिशय छान विद्यार्थ्यांनी सोडविला. त्यानंतर अभिक्षमतेत थोडासा वेळ लागला. या प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी अधिक होती. त्यासह प्रश्नांची उकल करत ते सोडविणे यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागला. मानसशास्त्रीय चाचण्या अतिशय उत्तम आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल.
शालिनी खंडाळे
कलचाचणी समन्वयक
कलचाचणीत प्रश्न सोपे वाटले. मी, कृषीबाबतचे प्रश्न अधिक सोडविले. यामध्ये नवीन काय धोरण आणाल, शेती करायला आवडते का कमी जागेत अधिक उत्पन्न येणारे पिके असे प्रश्न होते. ते सोडविताना छान वाटले. सुरुवातीला थोडेसे कसे सोडवायचे वाटत होते. मात्र, सहज सोडविता आले.
किरण चौधरी
विद्यार्थी
कलचाचणीतील प्रश्न अतिशय सुटसुटीत होते. त्यामुळे उत्तरे देताना फार काही वेगळे वाटले नाही. विविध सात क्षेत्रातून आपला कल कोणत्या क्षेत्राकडे हे कळेल. यात सरंक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे मी, अधिक गांभीर्याने पाहिले. त्यातील प्रश्न साधारणत: सोपे वाटले. अहवाल आल्यानंतर कळेल.
गजानन मालुसरे
विद्यार्थी