म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शासनाने पहिल्यांदाच दुष्काळ निकषामध्ये बदल करत ट्रिगरच्या निकषानुसार पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील १५१ तालुके आणि त्यानंतर २६८ महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अंतिम पैसेवारी अहवालामध्ये मराठवाड्यातील ९४२ गावे शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या यादीतच नाही. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यंदा दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले असले तरी दुष्काळ जाहीर करण्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येत असलेली पैसेवारीही त्या-त्या वेळेनुसार जाहीर करण्यात आली आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यातील तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये गंभीर किंवा मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्याचा निकष लागू झाला आहे. यानुसार शासनाने विवधि ट्रिगर वापरून पहिल्या टप्प्यामध्ये ३१ ऑक्टोबर रोजी १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला, यामध्ये मराठवाड्यातील ७६ पैकी ४७ तालुक्यांचा समावेश होता, सहा नोव्हेंबर रोजी राज्यातील २६८ मंडळांचाही यात समावेश करण्यात आला. त्यात मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश आहे. दोन्ही टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. आता खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली असून यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील सर्व गावे ५० पैशांपेक्षा कमी आलेली आहेत. यामध्ये विभागातील ८५३३ गावांपैकी ७२८१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. तर १२५२ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे. पैसेवारी कमी आलेल्या ७३८१ गावांमध्ये ९४२ गावे अशी आहेत, ज्यांचा समावेश दुष्काळी गावांमध्ये झालेला नाही. \Bपैसेवारीचा अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे\B खरीप पिकाची हंगामी व सुधारित पैसेवारी जाहीर केल्यानंतर १५ डिसेंबर रोजी खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. ही माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यातील पैसेवारी सोबतच राज्यात दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके २६८ मंडळा व्यतिरिक्त क्षेत्रातील ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांची संख्या ९४२ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. \Bही आहेत ९४२ गावे\B दुष्काळ जाहीर केलेल्या दोन्ही टप्प्यातील यादीत मंठा तालुक्यातील ५८, गंगाखेड २०, जिंतूर ६०, लातूर २०, रेणापूर ३७, उदगीर १७, अहमदपूर २२, निलंगा ६३, तर उमरगा तालुक्यातील ९६, नांदेड जिल्ह्यातील ५४९ गावे, अशा एकुण ९४२ गावांचा समावेश नाही. \Bआयुक्त म्हणतात...\B याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला असून आता ट्रिगरच्या निकषाद्वारे दुष्काळ जाहीर करून माहिती शासनाद्वारे केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. अंतिम पैसेवारीत अनेक गावे पन्नास पैशांच्या आत आहेत. या गावांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना राबवणे, दुष्काळ जाहीर करणे हा राज्यस्तरावरील विषय आहे, मात्र या गावांमध्ये पीक विमा, वीज कनेक्शन न तोडणे, कर्ज वसुलीला स्थगिती आदी मदत मिळू शकते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट