कोणी सरकारच्या विरोधात बोलले ते सरकारच्या विरोधात आहेत. त्यांना राष्ट्रविरोधी कसे म्हणता येईल, राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र देणारे आपण कोण, असा प्रश्न युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज उपस्थित करत केंद्र सरकारला टोला लगावला.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा व सिवरेज ट्रिटमेंट प्लांटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापौर नंदकुमार घोडेले यांचे भाषण सुरू असताना नमाजासाठी अजान सुरू होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांना भाषण थांबविण्याच्या सूचना केल्या. त्याला अनुरसरून एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी भाषणात आदित्य यांचे कौतुक केले. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मात्र, आम्ही कोणाला राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र देणे अयोग्य आहे. सरकारला जरी प्रश्न विचारला तर तो सरकारच्या विरोधातील प्रश्न असतो, तो देशाच्या विरोधात नसतो. त्याचा प्रश्न देशाविरोधात नसतो सरकारविरोधी असतो. जे देशासाठी काम करत असतील, त्या सगळ्यांना पाठबळ देणे आपले काम आहे. अनेक दिवसानंतर युतीच्या एकत्रित कार्यक्रमाला येता आले, याबाबत आनंद वाटत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट