म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरातील दहा वारसास्थळांचे भाग्य उजळण्याची आशा आता निर्माण झाली आहे. महापालिकेने वारसास्थळांच्या संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी विविध अंदाजपत्रकांना मंजुरी दिली आहे. आता या कामासाठी निविदा मागविण्याची तयारी असून, त्यानंतर दीड महिन्यात काम सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे. औरंगाबाद शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता शहरातील वारसास्थळांच्या देखभाल दुरुस्ती आणि संवर्धनासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पुढाकार घेतला आहे. इन्टॅक या संस्थेच्या मदतीने वारसास्थळांच्या संवर्धनाचे काम केले जाणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत झालेल्या सर्वसाधारण सभेत वारसास्थळांच्या संवर्धनासाठीच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली. दहा वारसास्थळांसाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेतर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात वारसास्थळांच्या संवर्धनासाठी प्रथमच आर्थिक तरतूद करण्यात आली आणि या तरतूदीला प्रशासनासह सर्वसाधारण सभेचेही मान्यता मिळाली. वारसास्थळांच्या संवर्धनाच्या कामाबद्दल इन्टॅकचे पदाधिकारी अजय कुलकर्णी म्हणाले, 'महापालिकेत अंदाजपत्रकांना मंजुरी मिळाल्यामुळे येत्या एक - दोन दिवसांत निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. निविदेचा कालावधी ३० दिवसांचा असण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच संवर्धनाचे काम सुरू केले जाईल. दीड ते दोन महिन्यात संवर्धनाची कामे सुरू होण्याची शक्यता आहे.' \Bइन्टॅक्टचे कामावर लक्ष\B कटकटगेट, जाफरगेट, पैठणगेट, काला दरवाजा, खिजरी दरवाजा, गोमुख या वारसास्थळांच्या संवर्धनाचे व विकासाचे काम लगेचच सुरू केले जाणार आहे. या कामावर इन्टॅकची टीम लक्ष ठेवून असणार आहे. सुरुवातीच्या काळात स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम केले जाणार असल्यामुळे विशेष कारागिरांची मदत घेण्याची गरज पडणार नाही. पडझड झालेल्या वास्तू सुस्थितीत आणण्यासाठी विशेष कारागिरांची मदत घ्यावी लागेल, त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. गोमुखचा विकास आणि त्या परिसरात विकसित केले जाणारे मुघल गार्डन यावर विशेष काम करण्यात येणार असल्याचे अजय कुलकर्णी यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट