म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'कामगार एकजुटीचा विजय असो,… हम सब एक है..' अशा घोषणा देत वीज कर्मचारी आणि अभियंत्यांनी वीज कंपनीच्या धोरणाविरोधात सोमवारी (सात जानेवारी) आंदोलन केले. या एक दिवसाच्या संपात ८० टक्के कर्मचारी, अभियंत्यांनी सहभाग नोंदविला.
वीज कर्मचारी-अभियंते संघटना कृती समितीतर्फे या संपाची हाक देण्यात आली. औरंगाबाद व अकोला येथील वीजवितरण खासगीकरणास विरोध, कर्मचारी पुनर्रचना, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट लागू करताना पदे कमी करू नये, लघु जल विद्युत निर्मिती प्रकल्प महानिर्मितीकडे ठेवावेत, पेन्शन लागू करावी आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. या संपात महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिकल वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोशिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस या सहा संघटनांनी सहभाग नोंदविला.
महावितरणच्या मिल कॉर्नर येथील मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर, महापारेषणसह इतर ठिकाणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संयुक्त कृती समितीचे सय्यद जहिरोद्दीन, ताराचंद कोल्हे, रोहिदास आल्टे, अरुण पिवळ, आर. पी. थोरात, बी. एल. वानखेडे, अनिल लेंभे, अभिजीत धर्माधिकारी, अविनाश चव्हाण, अविनाश जोशी, अख्तर अली, अभय पंडित आदींसह कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी १० जानेवारी रोजी पुण्यात बैठक आयोजित केली आहे. आमदार हर्षवर्धन जाधव व आमदार इम्तियाज जलील यांनी भेट देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले. याशिवाय माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनीही भेट देऊन काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान, दोन दिवसांच्या देशव्यापी संपात महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, म. रा. वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन या तीन संघटना सामील होणार नाहीत. महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिकल वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस संपात सामील होणार आहे.
……
\Bमहावितरणमध्ये कर्मचारी कपातीचा फेरविचार \B
या संपाबद्दल महावितरणने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात राज्यातील ५० टक्के कर्मचारी, अभियंते आंदोलनात सहभागी झाल्याचे म्हटले आहे. महावितरणमधील मनुष्यबळ पुनर्रचनेत कामगार कपात होणार नाही, याचा फेरविचार करण्यात येणार आहे, मुंब्रा, कळवा व मालेगाव विभागांची फ्रॅन्चायझी देण्यात येत असून ते धोरण आहे. हा निर्णयसुद्धा संघटनांशी चर्चा करून घेतला आहे. या संपाचा वीज वितरणावर परिणाम झाला नसल्याचे महावितरणने कळवले आहे.
……
\Bग्रामीण भागात तुरळक परिणाम \B
औरंगाबाद परिमंडळातील २८६५ कर्मचाऱ्यांपैकी २१८१ कर्मचारी संपात सहभागी झाले. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संपात सामील नसलेल्या कर्मचाऱ्यांसह १५०० प्रशिक्षणार्थी, कंत्राटी कामगार तैनात करण्यात आले. गंगापूर तालुक्यातील जामगाव, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी, औरंगाबाद तालुक्यातील गोलटगाव फीडर नादुरुस्त झाले. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याचे महावितरणने कळवले आहे.